पुणे : लोकमान्य टिळकांनी स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण ही चतुःसूत्री मांडून देशाला स्वातंत्र मिळवून दिले आहे. जन्मतः जगण्याचे स्वातंत्र असल्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये बोलण्याचा, आंदोलन करण्याचा व मते मांडण्याचा अधिकार उरला आहे का? असा सवाल उपस्थित करीत आपले स्वातंत्र्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम (p chidambaram) यांनी केले.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या 101 व्या वर्धापन दिनानिमित्त मास कम्युनिकेशन विभागामध्ये अद्ययावत प्रॉडक्शन कंट्रोल रूम आणि ब्रॉडकास्ट रूमचा शुभारंभ माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या हस्ते शुक्रवारी झाला. विद्यापीठाचा 100 वर्षांच्या वाटचालीच्या ग्रंथाचे प्रकाशन यावेळी त्यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना पी. चिदंबरम म्हणाले, लोकमान्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार असल्याचे इंग्रजांना ठणकावून सांगितले होते. स्वातंत्र्याशिवाय आपण काहीच साध्य करु शकत नाही, हे त्यांना माहीत होते. सहा दशकांच्या आयुष्यात ते भारतीय जनमानसाचे ते जननायक बनले होते. लोकमान्यांची स्मृतिशताब्दी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, की आपण स्वातंत्र्य स्वीकारले पाहिजे. प्रत्येक दिवशी आपण गमावलेल्या स्वातंत्र्याचा अनुभव आपण घेत असून सध्या आपले स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. लिहिणे, एकत्र जमणे, तसेच बोलण्याचे स्वातंत्र्य हिरावले जात आहे. आपण जन्मतः स्वातंत्र्य असून ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आमच्या मूलभूत अधिकारावर कोणीही गदा आणू शकत नाही. आजपर्यंत हजारो वर्षांपासून राजे, सरकार आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. आमचा आवाज कोणीही दाबू शकत नाही, असेही यावेळी पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केले.