कोळपणीच्या कामाला लवकरच सुरूवात : अधूनमधून पावसाची नितांत आवश्यकता
वार्ताहर /येळ्ळूर
येळ्ळूर परिसरामध्ये धुळवाफ पेरणी केली जाते. वळिवाचा पाऊस झाल्यानंतर बहुसंख्य शेतकऱ्यांनी मशागत करून धुळवाफ पेरणी केली होती. आता भात उगवणीला सुरूवात झाली असून, अनेक शेतकऱ्यांनी पेरलेल्या भाताची उत्तम उगवण झाली आहेआता त्यामध्ये लवकरच कोळपणीच्या कामालाही सुरूवात करण्यात येणार आहे. यावर्षी येळ्ळूर परिसरात वळिवाचे दमदार पाऊस कोसळले. त्यामुळे शिवारामध्ये बम तसेच तण उगवले होते. त्याची कोळपणी करून शेतकऱ्यांनी भात पेरणी केली होती. एप्रिल महिन्यापासूनच शिवारातील मशागतीच्या कामाला शेतकऱ्यांनी दमदार सुरूवात केली होती. कोळपणी करणे, शेणखत विस्कटणे आणि बांधांवर माती टाकणे ही कामे केली होती. त्यानंतर दमदार पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून भातपेरणी केली आहे. त्यामधील काही भातांची उगवण झाली आहे. सध्या आणखीन दमदार पावसाची गरज आहे. पाऊस झाला तर भाताची उगवण चांगली होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली आहे. तरी देखील शेतकऱ्यांनी ओलाव्यामध्ये भात पेरणी केली होती. त्यामुळे उगवण बऱ्यापैकी होत आहे.