वार्ताहर /नंदगड
खानापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे भाताच्या रोप लागवडीस बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. खानापूर तालुका अति पावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जून महिन्यात सर्वत्र दमदार पाऊस पडतो. त्यामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहतात. हंबडण, रोप लागवड आदी कामे सुरू होतात. शेतकऱ्यांसह मजुरांना एक काम मिळते. त्यामुळे सर्वत्र समाधानाचे वातावरण दिसून येते. मात्र यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये दोन-तीन पाऊस वगळता रोजच काही वेळ पाऊस व काही वेळ ऊन अशीच रोजची अवस्था सुरू होती. त्यामुळे मोठ्या पावसाअभावी हंबडणीची कामे खोळंबली होती.
मंगळवार दि. 2 रोजी दुपारनंतर व बुधवार दि. 3 रोजी सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शेतवडीत पाणीच पाणी झाले आहे. नदी, नाल्यांना बऱ्यापैकी पाणी आले आहे. शेतवडीत पाणी झाल्याने आता भाताच्या रोप लागवडीची कामे सुरू झाली आहेत. रोप लागवडीस हंगाम सुरू असल्याने एकाचवेळी सर्व ठिकाणी भात रोप लागवड सुरू असल्याने मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे आता एकमेकाला सहकार्य करून आठ ते दहा महिलांचे गट करून रोप लागवड करण्यात येत आहे. शेतवडीत रोप लागवड करण्यासाठी प्रथम चिखल करावा लागतो. पूर्वी बैल व रेड्यांच्या साहाय्याने चिखल केला जात होता. बदलत्या काळानुसार गेल्या काही वर्षांपासून पॉवर ट्रिल्लर व ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखल करण्यात येत आहे.