कंग्राळी बुद्रुक परिसरातील चित्र : शेतकऱयाला भात कापणीपर्यंत मिळू शकते उसंत
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, अलतगा, गौंडवाड परिसरात महिनाभर सुरू असलेली भातरोप लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. भातरोप लागवडीमुळे शेतकरी वर्गावरील भांगलणीचा ताण कमी होत आहे. भात लावणीमुळे उत्पादन अधिक मिळत आहे. रोपलागवड पेरणीपेक्षा सोयीस्कर असल्याचे मत शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.
भातरोप लागवडीवर अधिक भर
पूर्वी शेतकरी जवळ-जवळ 90 टक्के भातपेरणीच करत होते. 10 टक्के शेतकरी रोपलागवड करत होते. परंतु सध्या शेती तंत्रज्ञानामध्ये बरेच बदल झाल्यामुळे शेती करण्यास अनुकूल व वेळेत कामे होण्यासाठी ट्रक्टर, रोटरी कल्टीवेटर, पॉवर टिलर ही आधुनिक शेतीची अवजारे वापरून शेती करणे सोयीस्कर होऊ लागले. भातरोप लागवडीमध्ये आठ दिवस भरपूर काम लागते. त्यानंतर शेतकरीवर्गाला भात कापणीपर्यंत उसंत मिळते. भातपेरणी पद्धतीमध्ये पेरणीपासून ते भात कापणीपर्यंत कायम शेतकरीवर्गाला कामातच राहावे लागते. यामुळेच रोपलागवड पद्धतीकडे शेतकऱयांचा अधिक कल असल्याचे दिसून येत आहे.
पावसाळी बटाटे लागवड कालबाह्य
कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, अलतगा, गौंडवाड परिसरामध्ये अलतगा गाव वगळता तिन्ही गावांमधील माळजमीन संपुष्टात आल्यामुळे पावसाळी बटाटे लागवड कालबाह्य झाल्याचे चित्र आहे. पूर्वी कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, गौंडवाड परिसरामध्ये पावसाळी बटाटे लागवड भरपूर करण्यात येत होती. परंतु बेळगाव शहर परिसरामध्ये वाढत असलेल्या डुकरांच्या उपद्रवामुळे शेतकरीवर्गाचे पावसाळी बटाटे लागवड करणे बंदच झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
मार्कंडेय नदीकाठावरील भातरोपे पाण्याखाली
गेले तीन दिवस पडत असलेल्या दमदार पावसामुळे कंग्राळी खुर्द गावाजवळून वाहणाऱया मार्कंडेय नदीला दुसऱयांदा पूर आला आहे. मार्कंडेय नदीकाठ शिवारात भातरोपे पाण्याखाली गेली असून ती कुजून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीदरम्यान रोपलागवड केलेली शेती मार्कंडेय नदीच्या पुराखाली सापडत होती. म्हणून यंदा नागपंचमीनंतर रोप लागवड केली. हीसुद्धा कुजून गेल्यास परत रोपे कुठून आणायची, या विवंचनेमध्ये शेतकरीवर्ग आहे.