पाक पंतप्रधानांची भारताला विनंती : व्यापारामुळे मोठा लाभ होणार
वृत्तसंस्था/ अंकारा
भारत नेहमीच पाकिस्तानच्या राजकारणात महत्त्वाचा घटक राहिला आहे. इस्लामाबादच्या राजकीय वर्तुळात भारत नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तुर्कस्तानच्या दौऱयावर असताना द्विपक्षीय व्यापारामुळे भारत आणि पाकिस्तानला मोठा लाभ होऊ शकतो असे उद्गार काढले आहेत.
भारतासोबत चांगले व्यापारी संबंध प्रस्थापित करून आम्हाला मोठा लाभ होऊ शकतो हे आम्ही जाणून आहोत असे शरीफ यांनी म्हटले आहे. शाहबाज यांनी यापूर्वी पंतप्रधान मोदींनी पत्र लिहून दोन्ही देशांमधील वादग्रस्त मुद्दे शांततापूर्ण मार्गाने सोडविण्याची इच्छा व्यक्त केली होती. एप्रिलमध्ये सत्तेवर आलेले पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा संदेश पाठविला होता. या शुभेच्छा संदेशाच्या प्रत्युत्तरादाखल शाहबाज यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले होते.
सिंधू आयोगाची 118 वी बैठक
पाकिस्तानचे एक शिष्टमंडळ 30 मे रोजी नवी दिल्ली येथे पोहोचले होते. भारत आणि पाकिस्तानने सिंधू जल आयोगाच्या वार्षिक अहवालावर स्वाक्षरी केली आहे. दोन्ही देशांदरम्यान सिंधू जल कराराशी निगडित 3 जलविद्युत प्रकल्पांवर चर्चा झाली आहे.