ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पाकिस्तानच्या मंत्रीमंडळातील महिला मंत्री शाजिया मर्री (Shazia Murry) यांनी भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली आहे. भारत नेहमी पाकिस्तानवर आरोप करत असतो, धमक्या देत असतो. पण आम्ही अणुबॉम्ब शांत बसण्यासाठी बनवलेला नाही. हे भारताने लक्षात ठेवावे. गरज पडल्यास आम्ही मागे वळून पाहणार नाही, असे शाजिया मर्री यांनी म्हटले आहे.
बिलावल भुट्टो यांच्या समर्थनार्थ जिया मर्री यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या म्हणाल्या, आमची तक्रार भारताविरोधात नव्हती. तर पंतप्रधान मोदींविरोधात होती. पण भारताने पाकिस्तानवर आरोपांची मालिका सुरू ठेवली आहे. हे पाकिस्तान कदापी सहन करणार नाही. आमचं न्यूक्लिअर स्टेटस शांत राहण्यासाठी नाही. पाकिस्तानला प्रत्युत्तर द्यायचं माहीत आहे. पाकिस्तान एक थप्पड खाऊन दुसरा गाल समोर करणारा देश नाही. भारताकडून काही कारवाई झाल्यास त्याला उत्तर दिले जाईल.
आमची आण्विक स्थिती गप्प बसण्यासाठी नाही. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, हे भारताने विसरू नये. जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही मागे हटणार नाही, असेही मर्री म्हणाल्या.