नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भीषण भूकंपाने ग्रस्त झालेल्या तुर्किये या देशाला साहाय्य सामग्री घेऊन जाणाऱया भारतीय विमानांना पाकिस्ताने त्याच्या वायुक्षेत्रात प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे साहाय्यता सामग्रीचे विमान लांबच्या मार्गाने इराणवरुन न्यावे लागले. तुर्कियेमधील आणिबाणीच्या स्थितीतही पाकिस्तानने भारतासंबंधीचा दुःस्वास सोडलेला नाही, हेच यातून स्पष्ट होत आहे. पाकिस्तानची हीन मनोवृत्तीच यातून उघड झाली आहे, अशी टीका सोशल मिडीया आणि राजकीय वर्तुळात होत आहे.
भारताचे विमान मंगळवारी सकाळी जाणार होते. त्यासाठी पाकिस्तानकडे त्याच्या वायुक्षेत्रातून जाण्याची अनुमती रीतसर मागण्यात आली होती. तथापि, त्या देशाने ती देण्यास नकार दिला. परिणामी हे विमान इराणवरुन तुर्किये या देशात नेण्यात आले. त्यामुळे त्याला पोहचण्यासाठी तीन तास उशीर झाला. तसेच वाहतूक खर्चही वाढला. पण पाकिस्तान हा अत्यंत असंवेदनशील देश असल्याचे यातून पुन्हा एकवार स्पष्ट झाले अशी टीका अनेकांनी नंतर केली आहे.