फलंदाजीतील हाराकिरीमुळे भारताची निराशा, पाकविरुद्ध 2016 नंतर पहिलाच पराभव
सिल्हेत-बांगलादेश / वृत्तसंस्था
फलंदाजांनी हाराकिरी केल्यानंतर भारतीय महिला संघाला आशिया चषक टी-20 स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध 13 धावांनी धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. पाकिस्तानने 6 बाद 137 धावा केल्या तर प्रत्युत्तरात आशिया खंडातील मातब्बर संघ राहिलेल्या भारताचा डाव 19.4 षटकात सर्वबाद 124 धावांमध्ये आटोपला. 2016 नंतर टी-20 महिला क्रिकेट प्रकारात भारताचा हा पाकिस्तानविरुद्ध झालेला पहिलाच पराभव आहे.
वास्तविक, पाकिस्तानचा संघ थायलंडविरुद्ध अनपेक्षित पराभवानंतर खचलेला होता. मात्र, 24 तासाच्या आतच झालेल्या भारताविरुद्ध लढतीत त्यांनी जोरदार मुसंडी मारली, ते आश्चर्याचे ठरले. विजयासाठी 138 धावांचे तुलनेने माफक आव्हान असताना स्टार फलंदाज स्मृती मानधनासह (19 चेंडूत 17) बहुतांशी अव्वल फलंदाजांनी आपल्या विकेट्स फेकल्या आणि यामुळे पाहता पाहता भारताची 5 बाद 65 अशी दाणादाण उडाली.
या लढतीपूर्वी भारत-पाकिस्तान यांच्यात 2016 टी-20 वर्ल्डकपपासून झालेल्या सर्व लढतीत भारताने 10-2 असे एकतर्फी वर्चस्व गाजवले होते. येथे मात्र भारताला या कामगिरीत सातत्य राखता आले नाही.
पूजा वस्त्रकार मिसफिल्डचा लाभ घेत चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत झाली तर दयालन हेमलता (22 चेंडूत 20) हिला उत्तम प्रारंभाचे मोठय़ा खेळीत रुपांतर करता आले नाही. हरमनप्रीत कौर सातव्या स्थानी फलंदाजीला उतरल्याने तिच्या तंदुरुस्तीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.
भारताला शेवटच्या 6 षटकात 61 धावांची आवश्यकता असताना पाकिस्तानचा संघ रोमांचक विजय मिळवू शकतो, असे पहिले संकेत मिळाले. रिचा घोषने 13 चेंडूत 26 धावांची आतषबाजी केली. तिने प्रतिस्पर्धी फिरकी गोलंदाजांचा समाचार घेत 3 उत्तुंग षटकार खेचले. मात्र, ती 19 व्या षटकात डीपमध्ये झेल देत तंबूत परतली आणि ती बाद झाल्यानंतर भारताच्या सर्व आशाअपेक्षा संपुष्टात आल्या.
निदा दारचे नाबाद अर्धशतक
प्रारंभी, निदा दारने 37 चेंडूत नाबाद 56 धावा फटकावल्या. तसेच कर्णधार बिस्माह मारुफ (35 चेंडूत 32) हिच्यासह 58 चेंडूत 76 धावांची भागीदारी साकारली. निदा दारने विशेषतः फिरकीपटूंविरुद्ध उत्तम फुटवर्कच्या बळावर फटकेबाजी केली. ऑफस्पिनर दीप्ती शर्माने (3-27) सर्वात किफायतशीर मारा साकारला. मुनीबा अली, ओमेमा सोहेल मात्र स्वस्तात बाद झाले. बिस्माहला राजेश्वरी गायकवाडच्या गोलंदाजीवर पंचांनी नाबाद ठरवल्याने ती सुदैवी ठरली. अवघ्या 8 धावांवर मिळालेल्या जीवदानाचा तिला थोडाफार लाभ घेता आला.
पाकिस्तानने शेवटच्या 10 षटकात 3 गडय़ांच्या बदल्यात 61 धावा जमवल्या. निदा दारची फटकेबाजी यात महत्त्वाची ठरली. तिने हेमलताच्या एकाच षटकात एक चौकार, एक षटकारासह 15 धावा वसूल केल्या. भारतीय क्षेत्ररक्षणात काही चुका झाल्या. बदली खेळाडू शफाली वर्माने यष्टीचीतची सोपी संधी दवडली. या स्पर्धेत भारताचा पुढील सामना आज (दि. 8) बांगलादेशविरुद्ध दुपारी 1 वाजता होईल.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान महिला संघ ः 20 षटकात 6 बाद 137 (निदा दार 37 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह नाबाद 56, बिस्माह मारुफ 35 चेंडूत 2 चौकारांसह 32. मुनीबा अली 17. अवांतर 4. दीप्ती शर्मा 4 षटकात 3-27, पूजा वस्त्रकार 2-23, रेणुका सिंग 1-24).
भारतीय महिला संघ ः 19.4 षटकात सर्वबाद 124 (रिचा घोष 13 चेंडूत 1 चौकार, 3 षटकारांसह 26, दयालन हेमलता 22 चेंडूत 3 चौकारांसह 20, स्मृती मानधना 17, दीप्ती शर्मा 16, सब्बिनेनी मेघना 15. अवांतर 5. नश्रा संधू 4 षटकात 3-30, निदा दार, सादिया इक्बाल प्रत्येकी 2 बळी, ऐमन अन्वर, तूबा हसन प्रत्येकी 1 बळी).