मराठी राज्य भाषा समितीच्यी बैठकीत निर्णय, विधानसभेत ठराव संमत होऊनही दुर्लक्षच
वार्ताहर /पणजी
मराठीला राज्य भाषेचा दर्जा द्यावा म्हणून विधानसभेत ठराव संमत झाला असतांना आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सुध्दा त्याची अंमलबजावणी होत नसल्याने गोवा क्रांती दिनाच्या पूर्व दिवशी 17 जूनला सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत पणजी येथे आझाद मैदानावर मराठी प्रेमी धरणे आंदोलन करणार आहेत. आज मराठी राज्य भाषा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गोमंतक साहित्य सेवक मंडळात शनिवारी समितीचे निमंत्रक गो. रा. ढवळीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला व्यासपीठावर माजी केंद्रीय कायदा मंत्री ऍड. रमाकांत खलप, गोमंतक मराठी अकडमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर, दिवाकर शिंपे,प्रकाश भगत, व्यंकटेश विश्वनाथ नाईक उपस्थित होते.
गो. रा. ढवळीकर म्हणाले, घटनेच्या 345 कलमात,शासकीय व्यवहारातील एकाहून अधिक वापरात असलेल्या भाषा राजभाषा होऊ शकतात असे स्पष्टपणे म्हटले असतांना आणि गोव्यात मराठीचे नैसर्गिक अस्तित्व असतांना मराठीवर अन्याय केला जात आहे.मराठीचे महत्व लक्षात घेऊन आज कोकणी लेखक मराठी वर्तमानपत्रातून लिहायला लागलेत. बहुसंख्य वाचकांपर्यंत लिखाण मराठीमधून लिहिल्याने पोचेल हे त्यांना उमगले आहे.मराठीला राज्य भाषा दर्जा देण्याचा निर्णय, तांत्रिक अभ्यास करून घेतला जाईल असे सांगून मुख्यमंत्री या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत.
ऍड. खलप यांनी सांगितले की, मराठी ही शासकीय व्यवहारातील भाषा असताना त्याची अंमलबजावणी केली जात नाही. अल्पसंख्यांची मते मिळवण्यासाठी मराठीवर अन्याय केला जात आहे.मराठीप्रेमींच्या मतांवर निवडून येऊन सुद्धा मराठीच्या बाजूने ठामपणे राहील असा एकही आमदार आज विधानसभेत नाही.धरणे आंदोलनाच्या जागृतीसाठी तालुक्मयाच्या ठिकाणी बैठका घ्याव्यात अशी सूचना त्यांनी केली.
प्रभाकर ढगे यांनी सांगितले की, यावषीच्या अंदाजपत्रकात कोकणीसाठी सरकारने बारा कोटी रुपयाची तरतूद केली आहे मात्र मराठीसाठी सापन्न भाव दाखवला आहे. व्यंकटेश नाईक म्हणाले, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून किंवा स्थानिक भाषेतून झाले पाहिजे असे स्पष्ट आहे तेव्हा तो मराठी शाळांतून मराठीतूनच शिक्षकांनी सर्व व्यवहार करण्याचा आग्रह धरला पाहिजे. प्रदीप घाडी आमोणकर यांनी सांगितले की, मराठी राजभाषेचा लढा
हा आम्ही पुढे नेणार आहोत तेव्हा सर्व मराठी संस्था आणि मराठी प्रेमींनी हातात हात घालून काम करावे. बैठकीला ऍड भालचंद्र मयेकर, गोमंतक मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप केळकर,नवनाथ रामकृष्ण मुळवी, विनोद काशिनाथ पोकळे, नारायण गणेश गडेकर,राजाराम शिवाजी पाटील, पुंडलिक रामचंद्र भोसले, घनश्याम नारायण विर्डीकर, विनय विष्णू कापडी, बाबली अनंत कांदोळकर,अशोक घाडी,संदीप कोचरेकर, गोमंतक मराठी अकादमीचे सचिव भारत बागकर तसेंच गोव्याच्या ठिकठिकाणच्या भागातील मराठीप्रेमी उपस्थित होते.