कोल्हापूर; गेल्या 24 तासांपासून पडत असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पात्रात झपाट्याने वाढ होत आहे. काल सायंकाळी पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पातळी १६ फुटांवर होती. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पंचगंगा नदीची पातळी २४ फुटांपर्यंत पातळी आहे. एका रात्रीत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आठ फुटांची वाढ झाली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदीवरील जवळपास सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत दरम्यान शाहूवाडी तालुक्यातील बर्कि बंधारा पाण्याखाली गेल्याने पर्यटक अडकले होते. मात्र रात्री उशिरा ते पर्यटक सुखरूपपणे परतले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील बर्की धबधबा पाहण्यासाठी सोमवारी दुपारी २ वाजता कोल्हापूर येथून २ मिनीबस व ८ कार मधून अंदाजे ८० पर्यटक गेले होते. परतीच्या प्रवासावेळी सायंकाळी ५ वाजता बर्की गावाजवळील ताफेरा ओढा तसेच कासारी नदीवरील पुलावर पाणी आल्याने सर्व प्रवासी अडकले होते. दोन्ही ठिकाणची पाणी पातळी ओसरल्यावर सर्व वाहने व प्रवासी सुखरुप बाहेर पडली आहेत. या प्रवाशांना धीर देण्यासाठी व त्यांच्या सोयीसाठी बर्की ग्रामस्थ, तरुण मंडळाचे अध्यक्ष, गावकरी, रेशन दुकानदार व वनरक्षक त्यांच्या सोबत होते.
अतिवृष्टी होत असताना पर्यटकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून बर्की धबधब्यासह जिल्ह्यातील इतर सर्व धबधब्यांच्या ठिकाणी वर्षा सहलीला जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.