कोल्हापूर प्रतिनिधी
जिह्याच्या धरणक्षेत्रात रविवारी रात्रीपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होत असून पंचगंगेच्या पाणीपातळीत सोमवारी अवघ्या दहा तासांत तब्बल दहा फुटांनी वाढ झाली आहे. राधानगरी धरण 90 टक्के भरले आहे. पंचगंगा तिसऱयांदा पात्राबाहेर पडली असून इशारा पातळीकडे वाटचाल सुरु आहे. 66 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील मांडूकली येथे पुराच्या पाण्यामुळे रस्ता बंद केला आहे. जिह्यातील प्रमुख धरणे सुमारे 90 टक्क्यांपर्यंत भरल्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून मोठय़ा प्रमाणात जलविसर्ग सुरु होण्याची शक्यता आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
जिह्यातील पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. विशेषतः 8 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सोमवारी दिवसभरात 10 फुटांनी वाढ झाली. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता (उत्तर) रोहित बांदिवडेकर यांनी केले आहे.
1077 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा
अफवांवर विश्वास ठेवू नये, आसपास आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय कवीतके यांनी केले आहे. डोंगराळ भागात भूःस्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना तत्काळ पूर येणे अथवा गावठाणातील जुन्या धोकादायक घरांची पडझड अशा घटना संभवत असल्याने नागरीकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 117.3 मि.मी पाऊस
गगनबावडा तालुक्यात गेल्या चोविस तासांत सर्वाधिक 117.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर हातकणंगले तालुक्यात 34.2 मिमी पाऊस झाला असून शिरोळ 18.1, पन्हाळा 71.1, शाहूवाडी 90, राधानगरी 65.5, गगनबावडा 117.3, करवीर 57.8, कागल 44.6, गडहिंग्लज 44.7, भुदरगड 84.4 , आजरा 84.2, चंदगड 79.1 असा एकूण 60 मिमी पाऊस झाला आहे.राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता
राधानगरी धरणात 90 टक्के पाणीसाठा असून लवकरच स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे. तुळशी धरण 84, वारणा 84, तर दुधगंगा धरणात 79.16 टक्के पाणीसाठा आहे. राधानगरी धरणातून 1600 क्युसेक जलविसर्ग सुरु असून वारणा 1675, तर दुधगंगा धरणातून 1423 विसर्ग सुरु आहे. जिह्यातील 7 जिल्हामार्ग तर 11 ग्रामीण मार्ग वाहतूकीसाठी बंद झाले असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे.