पंढरीत सुमारे 10 लाख भाविक आषाढीच्या सोहळ्यासाठी दाखल
पंढरपूर/ संतोष रणदिवे
‘पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी,
प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे’
संत चोखामेळांच्या अभंगाप्रमाणे गेल्या 20 दिवसांचा प्रवास करून येणाऱया प्रत्येक वारकऱयांना पंढरीचे सुख हे त्रिभुवनात सामावणार नाही असेच आहे. कारण याठिकाणी प्रत्यक्ष परमात्मा विठोबा आहे. या एकाच भावनेतून एकादशीच्या पूर्वसंध्येला येथे सुमारे 10 लाखांच्या आसपास भाविक दाखल झाले आहेत. तसेच एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
शनिवारी विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग ही गोपाळपूरच्या पुढे जाऊन पोहोचली होती. कोरोना महामारीच्या सावटानंतर आषाढी यात्रेचा सोहळा पार पडत आहे. देशाच्या कानाकोपऱयातून भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसातही भाविक पायी दिंडीत चालत पंढरीत आले आहेत. चिखल तुडवत व हरिनामाचा गजर करीत भाविक विठ्ठलाच्या भेटीसाठी धावा करीत दर्शन रांगेत उभे आहेत.
एकादशीच्या सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह सर्व मानांचे संत पंढरीत येऊन विसावले होते. वाखरी येथून निघाल्यानंतर कॉलेज रोडसह सारा परिसर हा गर्दीने आणि माऊलींच्या आणि विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता. सध्या संपूर्ण पंढरी नगरी विठ्ठलमय होऊन गजबजून गेली आहे. शुक्रवारी सकाळपासूनच नगरप्रदक्षिणा करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली होती. याशिवाय आकाशातून पडणारे पावसाचे थेंब व चंद्रभागेमध्ये पाणी असल्याने स्नानाचा आनंद भाविकांनी लुटला. यात्रेमध्ये भाविकांची सोय व्हावी याकरिता प्रशासनाच्या वतीने देखील अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तयारी सुरू होती. दर्शन रांग ही पूर्णपणे वॉटरप्रुफ केल्याने भाविकांचा पावसापासून बचाव होत आहे.
भाविकांच्या सोयीसाठी चार बसस्थानके तयार करण्यात आली आहेत. एसटी बसेस तर 13 रेल्वे गाडय़ांतून यात्रेकरुंची ये-जा केली जात आहे. पावसाच्या संततधारेमुळे वारकरी वारी आटोपून परत जात आहेत. एसटी बसेस व रेल्वे गाडय़ांमध्ये वारकऱयांची गर्दी झालेली दिसून येत आहे.
वैष्णवांचा रात्रभर हरिजागर
आषाढी एकादशीच्या सोहळय़ासाठी प्रमुख संतांच्या पालख्यासमवेतच मोठय़ा संख्येने भाविकांची दाटी पंढरपुरात झालेली दिसून आली. त्यामुळे एकादशीच्या पूर्वसंध्येला केवळ आणि केवळ पंढरपुरात हरिजागर झालेला दिसून आला. त्यामुळे अवघी पंढरी नगरी एकादशीपूर्वीच दुमदुमण्यास सुरूवात झाली होती.
वाखरीत नयनरम्य रिंगण सोहळा
आषाढी यात्रेतील शेवटचा रिंगण सोहळा लक्ष-लक्ष नयनांनी पावसाच्या साक्षीने भाविकांनी अनुभवला. अश्वांनी रिंगण पूर्ण करताच भाविकांनी एकच जल्लोष केला. या रिंगण सोहळ्याप्रसंगी भाविकांत मोठय़ा प्रमाणात भक्तिभाव उत्साह दिसून आला. त्यानंतर पालख्यांनी पंढरीकडे प्रस्थान केले. पंढरीच्या सीमेवर प्रशासनाच्यावतीने पालख्यांचे स्वागत करण्यात आले. पालख्या पंढरीकडे येताना इसबावी ते पंढरपूर मार्गावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.