आषाढ महिन्यात जशी पंढरीची भक्ती वारी तशी याच महिन्यात पन्हाळा ते पावनखिंड ही शौर्यगाथा वारी आता रुढ झाली आहे. शिवरायांचा इतिहास जपणारी ही वारी म्हणजे धुवाँधार पाऊस, डोंगरदऱया, खळाळते ओढे-नाले आणि हिरव्यागार निसर्गाच्या साथीने असते. पन्हाळा ते पावनखिंड हा साधारण 45 किलोमीटरचा पायी प्रवास म्हणजे एक थ्रिल तर असतेच, पण इतिहास जगण्याची ती एक वेगळी अनुभूती असते. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी शंभर दीडशे इतिहासप्रेमी या मोहिमेत सहभागी होत होते. आता वेगवेगळ्या संस्थांच्या पुढाकारातून आठ ते दहा हजार तरुण, तरुणी, इतिहासप्रेमी या मोहिमेत सहभागी होतात. अर्थात काळाच्या ओघात अशा मोहिमेलाही काही नवे कंगोरे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ही मोहीम वर्षा पर्यटन न होता इतिहास जागवणारीच व्हावी, या हेतूने ‘तरुण भारत’ने अशा मोहिमेतील काही अनुभवी, अभ्यासू संयोजकांसोबत बुधवारी गेस्ट एडिटर सिनेटचे आयोजन केले. त्यात या मोहिमेसंदर्भात सर्व अंगाने चर्चा झाली. पन्हाळा पावनखिंड मोहीम इतिहास जागवणारी मोहीम म्हणूनच आखली जावी, जपली जावी, अशीच अपेक्षा सर्वांकडून व्यक्त झाली.
मूळ इतिहास जपतच ही सारी वाटचाल सुरू
पन्हाळा-पावनखिंड हा मार्ग शिवरायांच्या पदस्पर्शाचा मार्ग आहे. तेथे स्वराज्यासाठी लढणाऱया बाजीप्रभू देशपांडे व त्यांच्यासोबत असलेल्या मावळ्यांचे रक्त सांडले आहे. शिवरायांची युद्धनीती व मावळ्यांच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या या मार्गावरून जाताना सारा इतिहास ताजातावाना होतो. पाऊस, वारा, चिखलाची वाट याची तमा न बाळगता प्रत्येक इतिहासप्रेमी पन्हाळा ते पावनखिंड असे पायी मार्गक्रमण करतो. त्यामुळे या मार्गाचे ऐतिहासिक महत्त्व कायम राहील, अशा पद्धतीनेच या मोहिमांचे आयोजन केले पाहिजे.
ही मोहीम म्हणजे पावसाळी पर्यटन अशा स्वरूपाचे काही प्रकार घडत आहेत. काही जण याला इव्हेंटचे स्वरूप देऊन पैसे मिळवत आहेत. अर्थात त्यांची संख्या कमी आहे. पण इतिहास, भूगोल माहीत नसलेल्या काही इव्हेंट कंपन्या अशा मोहिमा आयोजित करू लागल्या तर मोहिमेचे पावित्र्य व गांभीर्य एक दिवशी नष्ट होईल. आमची यावर्षीची 58 वी मोहीम आहे. मोहिमेचा मूळ इतिहास जपतच ही सारी वाटचाल सुरू आहे आणि याच पद्धतीने ही वाटचाल पुढे सुरू राहणार आहे. अलीकडच्या काळात मोहिमेसाठी खूप गर्दी होत आहे. त्यामुळे गैरसोयी होत आहेत. त्यामुळे मोहिमांचे नियोजन परस्पर समन्वयातून होणे गरजेचे आहे.
प्रमोद पाटील (अध्यक्ष, हिल रायडर्स व हायकर्स)
सुनियोजित नियोजन व्हावे
छत्रपती शिवाजी महाराजांना आधुनिक भाषेत मॅनेजमेंट गुरु असे म्हटले जाते. पन्हाळा-पावनखिंड मार्गावरील युद्धनीतीचा इतिहास म्हणजे शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीची ती एक साक्षच आहे. त्यामुळे पन्हाळा-पावनखिंड मोहिमेकडे गांभीर्यानेच पाहिले पाहिजे. या मोहिमेला पुणे, मुंबईतून कमर्शियल पावसाळी सहलीचे स्वरूप दिले जात आहे. त्यामुळे मोहिमेला गर्दी वाढत आहे. पण अशा गर्दीपेक्षा इतिहासाची जाण असलेल्यांचा सहभाग खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी सर्व मोहिमांची शासकीय पातळीवर व केंद्रीय समन्वय समितीच्या सहाय्याने नोंदणी आवश्यकच केली पाहिजे. एका मोहिमेत किती जणांचा सहभाग असावा, याचीही मर्यादा निश्चित झाली पाहिजे. मोहिमेचा उद्देश इतिहास जपणे, हाच राहिला पाहिजे. कारण अशा पद्धतीने मोहिमांचे नियोजन झाले तरच पन्हाळा पावनखिंड या ऐतिहासिक मार्गाचे महत्त्व अबाधित राहणार आहे व ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू शकणार आहे.
सागर पाटील (कोल्हापूर हायकर्स)
मोहिमेला जत्रेचं स्वरुप नको
पन्हाळा-पावनखिंड मोहीम म्हणजे इतिहासाचे भान जपणारी व वाढवणारी एक मोहीम आहे. आपण कोल्हापूरकर भाग्यवान आहोत. कारण छत्रपती शिवरायांच्या युद्धनीतीचा एक अजरामर इतिहास पन्हाळा-पावनखिंड मार्गावर घडला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाऊन इतिहासाची जाणीव पुन्हा जागी करणे व ती जाणीव पुढे नेणे यासाठी ही मोहीम प्रेरणा देते. ही मोहीम चालत पूर्ण करून जेव्हा आपण पावनखिंडीत पोहोचतो, तो अनुभव शब्दांपलीकडचा असतो. अलीकडे या मोहिमेत हौसे, नवसे, गवसे असे सर्व प्रकारचे लोक सहभागी होत आहेत. त्यामुळे काही चुकीचे ही घडत आहे. या पार्श्वभूमीवर मोहिमांचे आयोजन करणाऱया ज्येष्ठ जाणत्या, अनुभवी संयोजकांची जबाबदारी आणखी वाढली आहे. मोहिमेत सहभागी होणाऱया प्रत्येकाला मोहिमेचा इतिहास कळाला पाहिजे, यासाठी प्रयत्नांची गरज आहे. या ऐतिहासिक मोहिमेला जत्रेचे स्वरूप येण्यापासून रोखायला हवे. कारण इतिहास प्रेमाच्या एका वेगळ्या जाणीवेनेच या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे.
उत्तम फराकटे (मोहीम सहभागी इतिहासप्रेमी)
मोहिमेला इव्हेंटच स्वरुप नको ः इतिहास जागवा
निर्व्यसनी, सशक्त ध्येयवादी, देशप्रेमी युवा पिढी निर्माण व्हावी, त्यांच्याकडून इतिहासाचे जतन, संवर्धन आणि संरक्षणाचे कार्य घडावे, तसेच इतिहासाचा अनमोल वारसा भावी पिढीकडे सोपवण्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांनी सज्ज व्हावे, अशा उद्देशाने विविध इतिहासप्रेमी, शिवभक्त संस्था, संघटनांकडून प्रतिवर्षी पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंतीचे आयोजन केले जाते. पावनखिंड मोहिमेला जाण्यापूर्वी सर्वांनी इतिहास समजून घेण्याची गरज आहे. ही मोहीम एक ऐतिहासिक शौर्यगाथेचं स्मरण करण्यासाठी आपण जात आहोत, याचं भान ठेवण्याची गरज आहे. मोहिमेवेळी वाटेतील वाडय़ा-वस्त्यांतील नागरिकांना त्रास होणार नाही, भातासह इतर शेतीचं नुकसान होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. मोहिमेचे आयोजन करताना सहभागी मावळ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. मोहिमेच्या माध्यमातून इतिहास जागा करण्याचा प्रयत्न व्हावा. सध्या मोहिमेला इव्हेंटच स्वरुप येऊ पहात आहे. ते टाळण्याचा प्रयत्न आयोजकांनीच करण्याची गरज आहे. पावनखिंड मोहीम म्हणजे इतिहास जागवण्याचा दिवस. वीर शिवा काशिद आणि बाजी प्रभू देशपांडे यांचं बलिदान आणि शिवरायांची युध्दनिती जोपासण्याचा ती समजून घेण्याचा प्रयत्न यानिमित्ताने व्हावा. मोहिमेचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न सर्वच घटकांकडून होण्याची गरज आहे.
पंडीत पोवार ( संस्थापक ः आनंदराव पोवार प्राचीन युध्दकला प्रशिक्षण संस्था)
समन्वय समितीचे नियंत्रण हवे
ही फक्त मोहीम नाही तर भावनेचा धागा आहे. तीन दशकांपासून आमच्या सारख्या शिवभक्तांनी मोहीम सुरू केली. त्यावेळी अक्षरशः बोटाला धरुन अनेकांची मोहीम फत्ते केली. मात्र आता कॉर्पोरेट कंपन्यांमार्फत या मोहिमेची सुरू असलेली इव्हेंटबाजी थांबवण्याची गरज आहे. ही मोहीम म्हणजे पावसाळी पर्यटन नाही. इतिहासाची अनुभूती देणारा मार्ग आहे. बाजारीकरणामुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व कमी होता कामा नये. रेन ट्रेकींग म्हणून होणारं बुकींग वेदनादायी आहे, हे विकृतीकरण पाहवत नाही. उत्तराखंडात निघणाऱया कावड यात्रेनंतर देशातील ही सर्वात मोठी ऐतिहासक मोहीम आहे. मोहीम करताना मार्गातील इतिहास, भूगोल, शौर्य समजेल, असेच नियोजन करण्याची गरज आहे. मोहिमेचे ऐतिहासिक महत्त्व कमी होत असल्याची खंत आहे. ऐतिहासिक महत्त्व राखावं, नियोजन आणि शौर्याचा इतिहास सांगणारी मोहीम व्हावी यासाठी संयोजकांसह शासनाचे संबंधित विभाग, पन्हाळा नगर पालिका, वाडय़ा-वस्त्यांचे प्रतिनिधी यांच्या सहभागाने मध्यवर्ती समन्वय समितीची स्थापना करावी. विशिष्ट नियमावली लावूनच नियोजनबध्दरित्या मोहिमांची आखणी व्हावी. इतिहासाचा मूळ गाभा हरवणार नाही, याची काळजी यानिमित्ताने घेतली जावी. पावनखिंड ही शौर्य गाथा सांगणारी मोहीम नियंत्रणाबाहेर जाऊ नये, याची सर्वच घटकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
डॉ. अमर आडके (दुर्ग अभ्यासक)
पर्यावरणाचा ऱहास टाळा
पावनखिंड मोहिमेला व्यावसायिक स्वरुप येत आहे. मोहिमेत एका वेळेला किती लोक सहभागी व्हावेत, हे ठरवावे. जेणेकरुन गैरसोय होणार नाही. नियंत्रण राहील. वाटेतील वाडय़ा-वस्त्यांवर ताण येणार नाही. कळत-नकळत मोहिमेत होणारी व्यसनाधिनता रोखण्याची गरज आहे. ऑगस्टनंतर या वाटेवर प्लास्टिकसह मोहिमेतील सहभागी लोकांनी टाकलेल्या वस्तूंचा खच पडलेला दिसतो. एका गावात दोन-दोन ट्रक भरतील इतका कचरा होतो. मोहिमेचं ऐतिहासिक महत्त्व कायम ठेवूनच याची आखणी व्हावी. काही मोजक्या व्यसनाधिनांच्या सहभागाने संपूर्ण मोहिमेला गालबोट लागते. गावकऱयांची सर्वांबाबतच एकसारखी भावना बनत आहे, हे सर्वांनी मिळून टाळण्याची गरज आहे. मोहिमेचा एक कालबद्ध कार्यक्रम ठरवावा. मोहिमेत सहभागी होताना अत्यंत गरजू परंतु कमीत कमी वस्तू सोबत ठेवण्याची मुभा द्यावी. प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद केला पाहिजे. मोहिमेत सहभागी लोकांनी टाकलेल्या वस्तूंमुळे येथील पर्यावरणाचा ऱहास होत आहे, तो टाळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. पावनखिंडीचा शासनस्तरावर विकास झाला आहे, ही समाधानाची बाब आहे. एसटी महामंडळाकडून नोंदणीनंतर दोन्ही वेळचं भाडे घेतले जाते. रिकाम्या मार्गाचे घेतले जाणारे भाडे बंद व्हावे.
भगवान चिले (अध्यक्ष ः निसर्ग वेध परिवार)
मोहिमेचं ऐतिहासिक महत्त्व अबाधित रहावे
स्वराज्य रक्षणासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली, त्या वीरांचे स्मरण करण्यासाठी ही मोहीम आहे. स्वामी निष्ठा कशी असावी, स्वराज्य प्रेम म्हणजे काय, देशासाठी कसं जगावं आणि वेळ आली तर कसं मरावं, हे सांगणारी ही गाथा आहे. शौयाची अनुभूती देणारी ही मोहीम असल्याचे भान प्रत्येक सहभागी घटकाने ठेवण्याची गरज आहे. पावनखिंड ही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यावेळी बलिदान दिलेल्या शुरांची शौर्यगाथा आहे. भटकंती करुन इव्हेंट करण्याचा मार्ग नाही. मोहिमेत नशाबाजी आणि हुल्लडबाजीला थारा नको. वाटेतील शेती आणि शेतकऱयांना त्रास होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. पावसाळी पर्यटन म्हणून नाही तर शौर्यगाथेची अनुभूती येणारी ही मोहीम ठरावी. हजारांच्या संख्येने सहभागी असलेल्या पाच मोहिमा झाल्या तर एका गावात पाच हजार लोक येतात. मोहिमेनंतर उघडय़ावरील शौच आणि इतर बाबींमुळे पर्यावरणासह गावकऱयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. या मोहिमेच्या निमित्ताने सुरू होऊ पाहणारं बाजारीकरण रोखण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. मोहिमेचे ऐतिहासिक महत्त्व अबाधित रहावे, यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे.
हर्षल सुर्वे (इतिहास प्रेमी)
मार्गावरील छोटय़ा गावाचा विकास
पन्हाळा-पावनखिंड मार्गावरील छोटय़ा गावांचा विकासही महत्त्वाचा असल्याचे प्रमोद पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, आंबवडे गावात जिल्हा नियोजन व विकास निधीतून मोठा हॉल बांधून घेतला आहे. इतर वेळी गावकऱयांना व मोहिमेच्या वेळी इतिहासप्रेमींना त्याचा उपयोग होतो. याच गावातील 14 मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी हिल रायडर्सने उचलली आहे.
पन्हाळा-पावनखिंड ः 45 किलोमीटरचा मार्ग
पन्हाळगडावरून सुरू होणारी ही पदभ्रमंती मोहीम- राजदिंडीमार्गे मसाई पठार- कुंभारवाडी-मांडलाईवाडी-करपेवाडी-आंबेवाडी-माळवाडी-पाटेवाडी-सुकामाचा धनगरवाडा- पांढरे पाणीमार्गे पावनखिंड अशी काढली जाते. सुमारे 45 किलोमीटर अंतराचा हा मार्ग आहे. दोन दिवस आणि एक रात्र असा हा पायी प्रवास आहे. शिवकाळात सिद्दी जोहरच्या वेढय़ातून सुटण्यासाठी टेहळणी करूनच हा मार्ग आणि आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या रात्रीची निश्चिती केली होती. शत्रू कोठूनही आला तरी त्याच्याशी चौके (पांढरे पाणी) येथेच भिडावे लागणार, हे गृहीत धरूनच मोर्चेबांधणी केली. पावनखिंड संग्राम हे गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचा जगातील सर्वोत्कृष्ट आदर्श असेच आहे.
केंद्रीय समन्वय समितीची गरज
पन्हाळा-पावनखिंड मोहिमेत देशभरातून सहभागी होणाऱयांची संख्या वाढली आहे. अमरनाथ यात्रेच्या धर्तीवर या मोहिमेचे नियोजन करण्याची गरज आहे. जेणेकरुन मोहिमेचे ऐतिहासिक महत्त्व आणि पावित्र्य जोपासले जाईल. पर्यावरणाचा ऱहास कमी करता येईल. मोहिमेवर नियंत्रण राहील. यासाठी मोहीम आयोजक संस्था, इतिहास अभ्यासक, पन्हाळा पालिका, शासनाचे अन्य विभाग, मार्गातील वाडय़ावस्त्यांतील ग्रामस्थांचे प्रतिनिधी यांचा सहभाग असणारी केंद्रीय समन्वय समितीची गरज चर्चासत्रात प्रकर्षाने पुढे आली. मे, जून महिन्यातच मोहिमेच्या तारखा आणि नियोजन निश्चित केले जाईल. सुनियोजित आणि अस्सल ऐतिहासिक वारसा जपणारी तसेच कोल्हापूरच्या पर्यटनासाठी भर घालणारी अशी ही मोहीम ठरेल, असे तज्ञांना वाटते.
मोहिमेला जाण्यापूर्वी हे ध्यानात ठेवा
आदिलशहाचा कडवा सरदार सिद्धी जोहर याचा पन्हाळा गडावरील चार महिन्यांचा वेढा छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 जुलै 1660 रोजी तोडला. शिवाजी महाराज यांनी शत्रूला चकवा देत विशाळगडाकडे कूच केली. पावनखिंड संग्राम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, शौर्य, साहस, पराक्रम, राष्ट्रप्रेम, शूर मावळ्यांची निष्ठा या साऱयांचा परमोच्च आविष्कार आहे. नरवीर बाजी प्रभूदेशपांडे, वीररत्न शिवा काशीद, फुलाजी प्रभूदेशपांडे, रायाजी बांदल, विठोजी काटे, शंभूसिंग जाधव यांच्यासह बांदल मावळ्यांच्या बलिदानाने हा संग्राम बनला. आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या रात्री सुरू झालेला हा रणसंग्राम दुसऱया दिवशी सूर्यास्तापर्यंत चालला. गटागटाने केवळ सहाशे मावळ्यांनी बलाढय़ शत्रूला रणसंग्रामात चितपट केले. सह्याद्रीचा स्थानिक भूगोल आणि नैसर्गिक संरक्षक डोंगररांगा व एकूणच निसर्गाच्या आविष्काराचा युद्धासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्पकतेने वापर केला.
पन्हाळा-पावनखिंड रणसंग्राम म्हणजे अंगावर रोमांच उभे करणारा शिवचरित्रातील महत्त्वाचा रणसंग्राम आहे. याच शौर्यशाली इतिहासाला नमन करण्यासाठी प्रत्येक वर्षी हजारो शिवभक्त मोहिमांत सहभागी होतात. मोहिमेतून शौर्यशाली इतिहासाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती कशी होती, त्याचे नियोजन कसे व्हायचे, इथंपासून ते स्थानिक भूगोलाचा वापर कसा करून घेतला गेला, अशा विविध अंगांनी नव्या पिढीला हा रणसंग्राम माहिती व्हायला हवा.
Previous Articleअवयव दानामुळे तिघांना जीवदान
Next Article शंभर फूट उंचीच्या ध्वजस्तभांवर फडकविला राष्ट्रध्वज
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.