ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बहीण पंकजा मुंडे यांच्यासोबतच्या नात्यात दुरावा असल्याचे जाहीरपणे कबुल केलं आहे. आमचं नाता आता बहीण भावाचं राहिलेलं नाही असं धनंजय मुंडे यांनी सांगितल्यानंतर राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. धनंजय मुंडेंच्या या विधानावर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही प्रतिक्रया दिली आहे. रक्ताचं नातं संपत नाही. तसंच आपण राजकारणात कोणालाही वैरी मानत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
आम्ही राजकारणात एकमेकांचे वैरी आहोत. नाते संबंध हे अगोदर होते. राजकारणामुळे वैर निर्माण झाले आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे म्हणाले होते. धनंजय मुंडेंच्या यांच्या विधानावर आता पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली. रक्ताची नाती कधीच संपत नसतात. मी कुणाशीही वैर बाळगत नाही. माझा कुणीही राजकीय शत्रु नाही. मी संबंधित व्यक्तींच्या विचारांसोबत राजकीय तुलना करत असते, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते धनंजय मुंडे
“आमचं नातं आता बहीण-भावाचं राहिलेलं नाही. आम्ही राजकारणात एकमेकांचे वैरी आहोत. नातेसंबंधं आधी होते, नात्यातून राजकारणात वैर निर्माण झालं. त्यामुळे आपल्या वक्तव्याने, वागण्यामुळे काय परिणाम होतात हे ज्याचं त्याने आत्मपरीक्षण करावं. वारंवार अशी वक्तव्यं करताना, ज्याचं त्याने आकलन करुन त्या पद्दतीने मांडावं,” असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
“रक्ताचं नातं संपत नाही”
दरम्यान धनंजय मुंडे यांच्या या विधानावर पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की “गोपीनाथ मुंडे यांनी रक्ताचं नातं कधी संपत नाही असं सांगितलं होतं. त्यांनी म्हटलं असलं तरी मी वैर बाळगत नाही. माझ्यासाठी कोणीही राजकीय शत्रू नाही. मी व्यक्तीच्या विचारांशी राजकारणाची तुलना करत असते. राजकारणात मला कोणी वैरी वाटत नाही. जो जनतेच्या हिताचा वैरी, तो माझा वैरी आहे”.