ज्ञानपीठविजेते दामोदर मावजो यांचे आवाहन, काणकोण कोकणी कला केंद्रातर्फे सत्कार
प्रतिनिधी /काणकोण
पोर्तुगीज काळात कोकणी भाषेवर खूप अन्याय झाला. मात्र गोव्यातील सामान्यातल्या सामान्य बहुजन समाजाने कोकणी सांभाळली. बालपणात रामायण, महाभारतातील कथांबरोबरच सानेगुरुजींच्या साहित्याने आपल्याला संवेदनशील बनविले. ही परंपरा पुढे नेण्यासाठी वाचन संस्कृती जोपासायला हवी. मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी पालक, शिक्षकांनी पुढाकार घ्यायला हवा, असे मत ज्ञानपीठविजेते साहित्यिक दामोदर मावजो यांनी माशे, काणकोण येथे बोलताना व्यक्त केले.
काणकोण कोकणी कला केंद्राने मावजो यांच्या नागरी सत्काराचे आयोजन माशे येथील सत्यवती सोयरू आंगले उच्च माध्यमिक विद्यालयात केले होते. त्यावेळी मावजो बोलत होते. या समारंभाला निवृत्त सनदी अधिकारी दौलतराव हवालदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते मावजो यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर काणकोण कोकणी कला केंद्राचे संस्थापक कमलाकर म्हाळशी, अध्यक्ष सूरज कोमरपंत, सचिव व्यंकटराय नाईक, निराकार शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक, शैला मावजो व शिरीष पै उपस्थित होते. भाषा हे एक माध्यम असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सर्जनशील साहित्यासाठी त्याचप्रमाणे अधिकाधिक लोकांकडे आपली साहित्यकृती पोहोचावी यासाठी आपण कोकणीकडे वळलो, असे मावजो यांनी सांगितले.
आजच्या मुलांमध्ये वाचनाची गोडी हळूहळू कमी होत गेली आहे. गोव्यातील चर्च आणि मंदिरानी पोर्तुगीज काळात देखील नृत्य, नाटय़, संगीत साधनेला महत्त्व दिले. गोव्यात पूर्वीपासूनच संत परंपरा रूजली होती. दामोदर मावजो यांचे साहित्य पाश्चिमात्य पगडय़ापेक्षा संत संस्कृतीशी निगडीत असे आहे. 450 वर्षे पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिलेल्या गोव्यात कादंबरी हा विषय जरा उशिराच आला, असे सांगून दौलत हवालदार यांनी, कलेची सर्व अंगे साहित्याला पोषक ठरत असतात, असे मत मांडले. सूत्रसंचालन शिरीष पै यांनी केले. उल्हास पै भाटीकर यांनी मावजो यांच्या रिझल्ट या कथेचे सादरीकरण केले. म्हाळशी यांनी स्वागत केले, प्रशांत नाईक यांनी परिचय करून दिला. मानपत्राचे वाचन सुदेश नाईक यांनी केले. व्यंकटराय नाईक यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले, तर सूरज कोमरपंत यांनी आभार मानले.