उदय कालकुंद्रीकर यांनी मांडले विचार : रामनाथकर शिष्यवृत्तीचे वितरण : आरपीडीच्या के.एम.गिरी सभागृहात आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
प्रत्येकजण वेगळा असतो, त्यांच्या आवडी-निवडी, छंद वेगळे असतात. त्यामुळे पालकांनी आपली अपूरी स्वप्ने विद्यार्थ्यांवर लादू नयेत. कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केल्यास सर्वेच्च कामगिरी करता येते. अपयश हा आयुष्याचा एक भाग आहे. त्यामुळे अपयशाने खचून न जाता प्रयत्न करीत रहा. इतर गोष्टींचा विचार न करता विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडेल त्याच क्षेत्रात करिअर घडवावे, असे विचार वसंतराव पोतदार पॉलिटेक्निक कॉलेजच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन उदय कालकुंद्रीकर यांनी मांडले.
साऊथ कोकण एम्पॉवरमेंट चॅरिटेबल फौंडेशनतर्फे मंगळवारी आरपीडी कॉलेजच्या के. एम. गिरी सभागृहात रामनाथकर शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. जिल्हय़ात सर्वाधिक गुण घेणाऱया विद्यार्थ्यांना यावेळी गौरविण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उदय कालकुंद्रीकर बोलत होते. व्यासपीठावर एसकेई संस्थेचे उपाध्यक्ष एस. वाय. प्रभू, कर्नल चंद्रनील रामनाथकर, व्यवस्थापन मंडळाच्या संचालिका लता कित्तूर, आशा रुस्तुमजी व जीएसएस पीयू कॉलेजचे प्राचार्य पी. के. पित्रे उपस्थित होते.
परिस्थितीचा बाऊ करू नका
बरेच विद्यार्थी आपल्याकडे येऊन कोणत्या शाखेला स्कोप आहे, अशी विचारणा करतात. परंतु त्यांना सांगायचे आहे की, कुठल्याच शाखेला स्कोप नसतो तर तुम्ही मेहनत घेऊन स्कोप तयार करायचा असतो. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर तीन पर्याय तयार ठेवावेत, एखाद्या विभागाला प्रवेश न मिळाल्यास प्लॅन बी व सी तयार ठेवणे गरजेचे आहे. बरेच विद्यार्थी आपले घर अथवा शारीरिक परिस्थितीचा बाऊ करतात. परंतु परिस्थितीवर मात करूनही यश मिळवता येते हे उदय कालकुंद्रीकर यांनी उदाहरणांसहीत स्पष्ट केले.
कर्नल चंद्रनील रामनाथकर व आशा रुस्तमजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. काही निवडक गुणवंत विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती स्वीकारून एसकेई सोसायटीचे आभार मानले. प्राचार्य पी. के. पित्रे यांनी स्वागत केले. कीर्ती फडके यांनी परिचय करून दिला. यावेळी बेळगाव परिसरातील विविध कॉलेजचे गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.