राहुल गांधींना सभागृहात बोलू देण्याची काँग्रेसची मागणी : सत्ताधारी माफीनाम्यावर ठाम
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संसद अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी कामकाज सुरू झाल्यानंतर 20 मिनिटांतच संपले. सभागृहातील गदारोळ आणि घोषणाबाजीमुळे सभापती ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केले. तसेच राज्यसभेचे कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. शुक्रवारी कामकाजाला प्रारंभ झाल्यानंतर काँग्रेसचे खासदार ‘राहुल गांधींना बोलू द्या’ अशा घोषणा देत होते. तर भाजप राहुल गांधींनी केंब्रिजमधील वक्तव्यावर माफी मागावी या मागणीवर गेल्या 4 दिवसांपासून ठाम आहे.
सभागृह तहकूब झाल्यानंतर काँग्रेस खासदारांसह 16 विरोधी पक्षांनी सोनिया, राहुल आणि खर्गे यांच्या उपस्थितीत महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ अदानी प्रकरणाच्या निषेधार्थ सरकारविरोधात घोषणाबाजी आणि आंदोलन केले. संसद सभागृहाच्या कामकाजादरम्यान माईकचा आवाज बंद करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. संसदेमध्ये विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असून ही लोकशाही आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी आपल्या आसनावरील माईक 3 दिवसांपासून बंद असल्याची तक्रार यावेळी बोलून दाखवली.
पंतप्रधानांविरोधात राज्यसभेत विशेषाधिकार भंग प्रस्ताव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राज्यसभेत विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणण्यात आला आहे. काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी हा प्रस्ताव मांडला. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने राज्यसभेच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. काँग्रेसने त्यांच्या विधानाच्या आधारे विशेषाधिकार भंगाची नोटीस पाठवली आहे.
राहुल गांधी यांच्या हकालपट्टीची मागणी
विरोधकांबरोबरच भाजपही राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक झालेला दिसत आहे. भाजपचे नेते निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून राहुल गांधी यांची सभागृहातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करावी, असेही सांगितले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुक्रवारी पाचवा दिवस होता. पहिले चार दिवस राहुल गांधींचे लंडनमधील भाषण आणि अदानी प्रकरणावर झालेल्या गदारोळात गेले. राहुल गांधी गुऊवारी संसदेत पोहोचले होते. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन सभागृहातील भाषणासाठी वेळ मागितला होता. दुसरीकडे भाजप राहुल गांधींच्या माफीनाम्यावर ठाम असल्यामुळे सभागृहात गदारोळ होताना दिसत आहे.
चौकशी समितीची भाजपची मागणी
खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी युरोप-अमेरिकेत आपल्या विधानांनी संसद आणि देशाच्या प्रतिष्ठेला सातत्याने कलंक लावला आहे. त्यामुळे त्यांची संसदेतून हकालपट्टी करण्याची वेळ आली आहे. त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, असे दुबे यांनी म्हटले आहे. तसेच भाजप अध्यक्ष जे. पी. न•ा यांनी एक व्हिडिओ जारी केला असून त्यामध्ये त्यांनी राहुल गांधींना माफी मागण्यास सांगितले आहे. सध्या काँग्रेस देशविरोधी कारवायांमध्ये गुंतली आहे हे दुर्दैव आहे. जनतेने वारंवार नाकारल्यानंतर राहुल गांधी या देशविरोधी टूलकिटचा कायमचा भाग बनले आहेत, असे म्हणाले.