नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनात शेतकरी आंदोलन, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर विरोधी पक्ष सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांसमोर येऊन संबोधित केलं. कोरोना विरोधातील लढाईत आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
पंतप्रधान मोदी यांनी अधिवेशन सुरु होण्याआधी मांध्यमांशी संवाद साधताना संसदेत कोरोना नियम पाळले पाहिजेत, असं आवाहन केलं. मी आशा करत आहे की तुम्ही सगळ्यांनी लसींचा कमीत कमी एक डोस घेतला असेल. तरीही तुम्ही करोनाच्या प्रोटोकॉलचे पालन करा. लस ही हातावर(बाहू) देण्यात येते आणि जेव्हा लस हातावर देण्यात येते तेव्हा तुम्ही बाहुबली बनता. कोरोनाविरुद्धच्या लढाईत जर तुम्हाला बाहुबली बनायचे असेल तर तुम्हाला हातावर लस घ्यावी लागेल. कोरोनामध्ये आतापर्यंत ४० कोटी लोक बाहुबली झाले आहेत, असे देखील नरेंद्र मोदी म्हणाले.
कोरोनाने देशासह जगातील संपूर्ण मानवजातीला वेढलं आहे. या अधिवेशनात अर्थपूर्ण चर्चा व्हायला हवी, जेणेकरून कोरोनाविरुद्धची लढाई अधिक धारदार होईल अशी आमची इच्छा आहे. मी सर्व नेत्यांना विनंती केली आहे. आम्हाला सभागृहात तसंच बाहेरही चर्चा हवी आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी कठीणातील कठीण प्रश्न विचारावेत. पण सरकारला उत्तर देण्याची देखील संधी द्यावी, असं मोदी म्हणाले.