नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी गदारोळ घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधन सुरू केलं. अनेक दलित बांधव मंत्री बनले आहेत याचा आम्हाला आनंद आहे. अनेक मंत्री ग्रामीण भागातून आले आहेत. परंतु काही जणांना हे आवडत नाही, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना लगावला. दरम्यान यावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ घालण्यास सुरुवात केली.
मला वाटलं इतक्या महिला, दलित, आदिवासी मंत्री झाल्याने संसदेत उत्साह असेल. यावेळी कृषी, ग्रामीण, ओबीसी समाजातील सहकाऱ्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलं आहे. पण काही लोक महिला, ओबीसी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मंत्री होण्याची संधी दिल्याने आनंदी नाहीत. यामुळे त्यांची ओळख करुन देण्याची परवानगी ते देत नाहीयेत, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ घालण्यास सुरुवात केली.
राज्यसभेत यावर्षी ज्या खासदारांचं आणि बड्या व्यक्तींचं निधन झालं त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी दिवंगत ज्य़ेष्ठ अभिनेते दिलिप कुमार आणि भारताचे धावपटू दिवंगत मिल्खा सिंग यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर सभागृहाचं कामकाज १२.२४ मिनिटांपर्यंत स्थगित करण्यात आलं.