कंत्राटदार झाले गायब, सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष : कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
बेळगाव : बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील सुळगा गावाजवळ केंबाळी नाल्यावर ब्रिज बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र हिंडलगा येथे बॉक्साईट रोडवरील पुलाचे बांधकाम गेल्या दोन वर्षापासून सुरू असून अद्यापही पूर्ण झाले नाही. हे काम पूर्ण करण्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केले आहे. या पुलाप्रमाणेच केंबाळी नाल्यावरील पुलाचे बांधकाम अर्धवट ठेवणार का? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. फॉरेस्ट चेकपोस्ट नाका ते सह्याद्री नगरपर्यंतच्या बॉक्साईट रोडचे रुंदीकरण करण्यात आले. त्यानंतर या रस्त्यावर ख•s निर्माण होऊन दुरवस्था झाली होती. त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण देखील करण्यात आले आहे. तसेच हिंडलगा गावाजवळ असलेल्या नाल्यावरील पूल अरूंद आणि खराब असल्याने पुलाची रुंदी वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. सदर काम सुरू करून दोन वर्षे झाली. पण अद्यापही पूर्ण झाले नाही. पुलाचे बांधकाम रखडले असून, कंत्राटदार गायब झाला आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी गावातील नागरिकांसह ग्रा. पं. सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडे अनेकवेळा तक्रारी केल्या. पण याची दखल घेण्यात आली नाही.
सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याच उपाययोजना नाहीत
पुलाचे बांधकाम करण्यासाठी खोदलेल्या ख•dयात वाहने कोसळण्याची घटना देखील घडली होती. पुलाच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पण, दोन्ही बाजूने माती घालण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच संरक्षक कठडा बांधण्यात आला नाही. त्यामुळे वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावर पथदीप नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. रात्री या ठिकाणी नेहमी अपघात घडत असतात. संरक्षक कठडा किंवा सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याच उपाययोजना राबविल्या नाहीत. पूल असल्याबाबतचा सूचनाफलक देखील लावण्यात आला नाही. या रस्त्यावरून अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे.
अधिकाऱ्यांच्या सूचनेकडे कंत्राटदाराचा कानाडोळा
पुलाच्या बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता सदर कंत्राटदाराला अनेकवेळा सूचना केली. पण कंत्राटदाराने दुर्लक्ष केले असल्याचे सांगितले. कंत्राटदाराला नोटीस देखील बजावण्यात आली. पण काम पूर्ण केले नसल्याचे सांगण्यात आले. सदर कंत्राटदार आमदारांच्या मर्जीतील असल्याने अधिकाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून काम अर्धवट ठेवले असल्याचे सांगण्यात येत आहे. आमदारांच्या सूचनेवरूनच सदर काम कंत्राटदाराला देण्यात आले होते. पण हे काम पूर्ण करण्याकडे कंत्राटदाराने कानाडोळा केला असून, या ठिकाणी घडणाऱ्या अपघाताला कारणीभूत कोण? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यासह जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देवून पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.