प्रतिनिधी /बेळगाव
वाढदिवस किंवा कोणत्याही सण-समारंभावेळी शिवारांमध्ये पार्ट्या करण्याचे पेव वाढले आहे. बऱ्याचवेळा मित्रांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साजरा करण्यासाठी शिवारामध्ये पार्टीचे आयोजन केले जाते. पार्टीनंतरचे टाकाऊ साहित्य शेतामध्ये फेकण्यात येते. याचा त्रास शेतकऱ्यांना होवू लागला आहे. तेव्हा प्रत्येकाने याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन आता शेतकऱ्यांतून होत आहे.
निर्जनस्थळी पार्ट्यांचा बेत आखला जातो. पण काही युवक जवळचा पर्याय म्हणून गावातील शेतात पार्ट्या करत आहेत. पण याचा त्रास मात्र शेतकऱ्यांना होत असतो. अशीच एक वाढदिवसाची पार्टी अनगोळ येथील शिवारात आयोजित केली होती. अनगोळ शिवारातील सर्व रस्ते डांबरीकरण करण्यात आल्यापासून युवकांचा कल हा शिवारातील शेतात किंवा शेतातील नाल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रविवार किंवा एखाद्या सुटीदिवशी आणि मित्रांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या भागात पार्ट्यांचे प्रमाण अधिक असते. अनगोळ येथील नाथ पै नगर ढब्बू तलावाच्या बाजुला असलेल्या शिवारात तर पार्टी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.
शनिवारी रात्री अशीच एक पार्टी या भागात झाली. रविवारी सकाळी शेताकडे शेतकरी गेले असता शेतामध्ये असलेल्या काचेच्या बॉटल्स आणि साहित्य पाहून शेतकऱ्यांना धक्का बसला. पार्टी एका युवकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आल्याचे त्या ठिकाणी पडलेल्या साहित्यावरून दिसून आले. आतषबाजीचे साहित्य, लहान मुलांना डोकीवर घालायची टोपी, लहान मुलांचे वाजवण्याचे पावा आणि त्याचबरोबर मद्य, पाणी व शीतपेयाच्या साधारण 20 बाटल्या, वाढदिवसाचा केक व त्याचे बॉक्स, कुरकुऱ्याची पाकिटे मोठ्या प्रमाणात पडली होती.
युवकांच्यावतीने शिवारात होत असलेले हे प्रकार बंद होण्याची गरज आहे. शेतात सुगीवेळी शेतकरी महिला व जनावरे काम करताना त्यांच्या पायांना काचा लागून इजा होतात. त्यामुळे शेतकरी वैतागला आहे. रात्रीच्यावेळी रस्त्यावर बसून मद्यपान करणे, रस्त्यावर वा शेतात बाटल्या टाकणे फोडाफोडी करणे हे चुकीचे आहे. पार्टी झाल्यानंतर सर्व टाकाऊ साहित्य, कचरा, बाटल्या कचरा कुंडीत टाकणे, अथवा त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. पण असे होताना दिसत नाही. रात्रीच्या अंधारात मोकळ्या रस्त्यावरून जोरात वाहन चालवून अनेक युवकांचे अपघातही घडले आहेत. काही जणांच्या जीवावरही बेतले होते. पण तरीही या ठिकाणी असे प्रकार बंद होताना दिसत नाहीत. तेव्हा तरुणांनीही याबाबत गांभीर्याने विचार करावा. आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होवू नये याची खबरदारी तरुणांनी घेणे गरजेचे आहे, असे मत शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.