विमान प्रवासी संख्येत झपाटय़ाने वाढ : मे महिन्यात 35 हजारांचा आकडा पूर्ण करण्याचा आंदाज
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱया प्रवाशांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. एप्रिल महिन्यात 34,512 प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद विमान प्राधिकारणाने केली आहे. बेळगाव-दिल्ली विमानफेरीमुळे प्रवासी संख्या झपाटय़ाने वाढत आहे. मे महिन्यात प्रवासी संख्या 35 हजारांचा आकडा पूर्ण करेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
सांबरा येथील विमानतळावरून शहरातील महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा सुरू आहे. कमी वेळेत प्रवासी एका शहरातून दुसऱया शहरात पोहोचत असल्यामुळे विमान प्रवासाला पसंती दिली जाते. बेळगावमधून सुरू केलेले अनेक मार्ग हे उडान 3 अंतर्गत मंजूर असल्यामुळे कमी तिकिटामध्ये प्रवासी विमान प्रवास करीत आहेत. बेंगळूर, मुंबई, हैदराबाद, दिल्ली, पुणे, तिरुपती, नागपूर, नाशिक, अहमदाबाद, इंदूर, सूरत, जोधपूर शहरांना थेट विमानसेवा सुरू आहे.
चेन्नई-मंगळूर शहराला विमानसेवेने जोडा
चेन्नई येथे अनेक शिक्षण संस्था तसेच कार्यालये असल्यामुळे बेळगाव चेन्नई यादरम्यान प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. मध्यंतरी इंडिगोने या मार्गावर विमानफेरी सुरू केली होती. परंतु प्रवासी संख्या कमी असल्याचे कारण देत काही दिवसातच ही विमानफेरी बंद झाली. मंगळूर हे शहर कोकण किनारपट्टीला जोडणारे शहर असून पर्यटनदृष्टय़ा महत्त्वाचे आहे. त्यामुळे चेन्नई व मंगळूर या दोन्ही शहरांना विमानसेवा सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे.
महिना | प्रवासी संख्या | विमानांची ये-जा |
जानेवारी | 18056 | 430 |
फेब्रुवारी | 23302 | 451 |
मार्च | 30404 | 514 |
एप्रिल | 34512 | 546 |