परिवहनच्या ताफ्यात जुन्या बसचा भरणा, बस बंद पडण्याच्या प्रकारात वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
परिवहनच्या ताफ्यात जुन्या बसची संख्या वाढल्याने रस्त्यात बस बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसगाड्या रस्त्यातच नादुरुस्त होत असल्याने प्रवासी हैराण होत आहेत. एकूण बस व्यवस्थेवर याचा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे सुस्थितीत असलेल्या बस वाहतुकीसाठी वापराव्यात, अशी मागणी होत आहे.
विविध मार्गावर बससेवा सुसाट धावू लागली आहे. दरम्यान कोरोना काळात परिवहनला कोट्यावधींचा फटका बसला होता. त्यामुळे परिवहनच्या तिजोरीत ठणठणाट निर्माण झाला होता. शिवाय परिवहनला नवीन बस खरेदीची गरज असताना निधीअभावी बीएमटीसीच्या जुन्या बस खरेदी करण्याची वेळ आली. बीएमटीसीच्या 25 जुन्या बसेस बेळगाव आगारात दाखल झाल्या आहेत. काही दिवसांपासून त्या विविध मार्गावर धावू लागल्या आहेत. मात्र या बसेसचे आयुर्मान संपले असल्याने रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत.
काही दिवसांपूर्वी बिजगर्णी मार्गावर धावत्या बसचा टायर निखळला होता सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ताफ्यात जुन्या बसचा भरणा अधिक असल्याने रस्त्यात बस बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: रात्री उशिराने प्रवास करणाऱ्यांसमोर अडचणी वाढत आहेत.
राज्य सरकारकडून परिवहनला नवीन बस खरेदीसाठी अनुदान मिळेनासे झाले आहे. दरम्यान, परिवहनला जुन्या बसवर प्रवासी वाहतूक करावी लागत आहे. मात्र जुन्या बसची संख्या अधिक असल्याने परिवहनसमोर अडचणी वाढल्या आहेत. परिणामी काही ठिकाणी बसफेऱ्यादेखील कमी कराव्या लागत आहेत. त्यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांची हेळसांड होऊ लागली आहे.
विशेषत: ग्रामीण भागात जुन्या बसचा ताफा पाठविला जात आहे. त्यातच ग्रामीण भागातील रस्त्याची दुर्दशा झाल्याने रस्त्यात बस पंक्चर होणे, धूर सोडणे, ब्रेक फेल होणे, बस बंद पडणे आदी प्रकार वाढले आहेत. प्रवासी वाहतुकीसाठी बिघाड झालेल्या बस पाठविल्या जात असल्याने असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे परिवहनने सुस्थितीत असलेल्या बस पाठवाव्यात, अशी मागणी होत आहे.
बीएमटीसीकडून 25 बस खरेदी
कोरोना काळापासून परिवहनकडे पैशांची चणचण भासत आहे. त्यामुळे नवीन बस खरेदी करणे शक्य नाही. बीएमटीसीकडून 25 बस खरेदी करण्यात आल्या आहेत. शिवाय नादुरूस्त बस दुरूस्त करून मार्गावर पाठविल्या जात आहेत. प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
– पी. वाय. नायक (विभागीय नियंत्रण अधिकारी)