ग्रामस्थांसह विद्यार्थीवर्गाची रोज अडीच कि. मी. पायपीट : परिवहनचे दुर्लक्ष, प्रवाशांची हेळसांड
वार्ताहर /उचगाव
उचगाव-कोवाड मार्गापासून अडीच किलोमीटर आत असलेल्या बसुर्ते या गावातील प्रवासीवर्गाची बसअभावी मोठी कुचंबणा होत असून या गावाला नियमित सकाळी आणि सायंकाळी बससेवा सुरू करावी, अशी मागणी बसुर्ते येथील ग्रामस्थांनी तसेच विद्यार्थी व पालकवर्गाने केली आहे.
बसुर्ते हे गाव या मुख्य रस्त्यापासून अडीच किलोमीटर आत असल्याने रात्रीच्या वेळी अथवा रुग्णांची, महिलांची, विद्यार्थिनींची ऊन-पावसाच्या या माऱयामध्ये ये-जा करणे मुश्कील होते. यासाठी सकाळी सात, आठ, नऊ आणि दहा वाजता व सायंकाळी पाच, सहा आणि सात या वेळेमध्ये नियमित बस असावी. तसेच दुपारी बारा, एक, दोन वाजता अशा वेळेमध्ये बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी येथील ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
सकाळी या गावातून अनेक विद्यार्थी शाळा, कॉलेजसाठी बेळगावला जातात. शाळा सुटल्यानंतर सायंकाळी घरी येण्यासाठी विद्यार्थ्यांना कोवाड, अतिवाड या गावाकडे जाणाऱया बसवर अवलंबून राहावे लागते. शिवाय या बसने आल्यानंतर अडीच किलोमीटरची पायपीट करण्याची वेळ या सर्वांच्यावर येते. रात्री उशिरा घरी जायचे असेल तर अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनेक झाडांतून वाट काढत गावाकडे जाण्याची वेळ येते. याबरोबरच अनेक रुग्णांचेही हात होतात. रुग्णमंडळींना चालत ये-जा करणे मुश्कील होते. तर कोणतेच वाहन या गावाला नसल्याने महिलावर्ग व रुग्ण यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
सकाळी गावातील प्राथमिक शाळेला येणाऱया शिक्षक, शिक्षिकांची मोठी तारांबळ उडते. बसुर्ते फाटय़ावरून जवळपास तीन किलोमीटर शाळेत जाण्यासाठी अंतर कापावे लागते. पुन्हा सायंकाळी बस पकडण्यासाठी तीन किलोमीटर अंतर असा प्रवास करावा लागतो. यामुळे शिक्षकवर्गाला शाळेत वेळेत पोहचण्यासाठी धावपळ करावी लागते. यासाठी सकाळी, दुपारी आणि सायंकळच्या वेळेत बसची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिक, प्रवासी, विद्यार्थी आणि शिक्षकांतून आहे.
शिंदोळीत बसअभावी प्रवाशांची गैरसोय
शिंदोळी व परिसरातील उपनगरात बसअभावी प्रवाशांची गैयसोय होत आहे. या भागात अद्याप बससेवा सुरू न झाल्याने प्रवाशांची हेळसांड होताना दिसत आहे. परिणामी विद्यार्थी वर्गांचे हाल होत असून बसपास असूनदेखील आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे या भागात तातडीने बस सुरू करावी, अशी मागणी परिसरातील प्रवाशांतून होत आहे. शिंदोळी परिसरात बसवनगर, श्रीरामनगर, इंडॉल कॉलनी, साईनगर, गंगाधरनगर, यासह भरतेश कॉलेजमुळे प्रवाशांची संख्या अधिक आहे. मात्र या मार्गावर बस नसल्याने खासगी वाहनांवर अवलंबून रहावे लागत आहे. कोरोनानंतर शाळा-कॉलेज, बाजारपेठ आणि इतर गोष्टी सुरळीत सुरू झाल्या आहेत. त्यामुळे कामगार-नोकरदार प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र परिसरात बससेवा नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
शिंदोळी परिसरात बस असल्याने प्रवाशांना सांबरा, बसरीकट्टी, मुतगा, बाळेकुंद्री, सुळेभावी, मारिहाळ आदी गावच्या बसचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र शिंदोळी क्रॉसपासून प्रवाशांना पायी चालत घर गाठावे लागत आहे. त्यामुळे शिंदोळी परिसरातील प्रवाशांतून स्वतंत्र बस तातडीने सुरू करावी, अशी मागणी होत आहे.