‘तारे जमीन पर’ चित्रपटाचा नायक शाळकरी मुलगा ‘ईशान’ पाण्यात मासे शोधतो आहे, त्यामध्ये इतका तल्लीन झाला आहे, की त्याला शाळेतून घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या बसचे भान राहात नाही. तो एका डबक्यातले छोटे मासे त्याच्याजवळ असलेल्या पाण्याच्या बाटलीत भरून घेतो, त्याचवेळी बसचा कंडक्टर त्याच्या बखोटीला धरून बसमध्ये घेऊन जातो. ईशानला उत्सुकता असते, ते मासे कसे फिरतात, घरातल्या फिशपाँडमध्ये कसे राहतात असे बरेच काही बघण्यात तो मग्न असतो. घराजवळ येताच तो रस्त्यावरच्या कुत्र्याला बोलावतो, त्या कुत्र्याचा कान स्वच्छ करतो. कुत्रासुद्धा ईशान सांगेल ते मनोभावे ऐकतो. जीवशास्त्राचा खरा अभ्यास हाच आहे. आजूबाजूला दिसणारे प्राणी, पक्षी निरखून बघणे, त्यांच्या रोजच्या जीवनात डोकावणे, त्याच्या नोंदी ठेवणे, आजूबाजूला असलेल्या झाडांच्या पानांमधील वैविध्य न्याहाळणे, त्यांच्या रंगांमधील फरक लक्षात घेणे, हिच तर खरी विज्ञानाची अभ्यासू वृत्ती. विज्ञानाची अशी आवड लहानपणी असते पण नंतर घोडे कुठे पेंड खाते?
“तुम्हाला न आवडणारा विषय कोणता?’’ असा प्रश्न अनेक शाळांमध्ये वेगवेगळय़ा इयत्तेच्या विद्यार्थ्यांना विचारला जातो त्यावेळी ‘सायन्स’ हेच उत्तर बऱयाच वेळेला मिळते. याचे कारण विज्ञान हा विषय पुस्तकामधूनच शिकवला जातो आणि किंबहुना तो पुस्तकामध्येच राहिला आहे. विज्ञानाची आवड जोपासण्यासाठी शाळेमध्ये प्रवेश घेण्याची आवश्यकता नसते. घरामधूनच जोपासली जाऊ शकते. ‘चहा कसा करतात?’, ‘भात कसा शिजतो, कधीकधी का शिजत नाही?’, ‘रोज पाणी का प्यावे?’, ‘दुध का प्यावे?’, ‘मोठी माणसे दुध न पिता चहा का पितात?’, ‘दात का घासावेत?’, ‘दात कशामुळे किडतात, सफरचंद खाल्यामुळे की कॅडबरी खाल्ल्यामुळे?’, ‘रोज चॉकलेट खाऊन दात घासले तर दात किडतात का?’, ‘टीव्ही बघितल्यामुळे डोळे बिघडतात ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा?’, ‘टीव्हीवरच्या जाहिरातीमध्ये कोणीही पांढरा कोट घालून काही सांगताना दिसला/ली तर ती व्यक्ती डॉक्टर आहे असे मानणे ही अंधश्रद्धा आहे. त्यामुळे ‘कोणीही काहीही सांगितले तर त्यावर डोळे मिटून विश्वास ठेवावा का?’ असे रोजच्या आयुष्यातील अनेक प्रश्न खरे तर विज्ञानाशी निगडीत आहेत. परंतु घरामध्ये या विषयांवर चर्चा होत नाही. ‘मोठे बोलत असताना मध्येमध्ये बोलू नये’, ‘आगाउपणाने प्रश्न विचारू नकोस’, ‘मोठय़ांनी सांगितलेले ऐकावे, प्रश्न विचारू नये’ अशी वाक्मये लहानपणापासून कानावर पडतात आणि लहान मुलांच्या प्रश्न विचारण्याच्या वृत्तीला खीळ बसते.
‘आकाशाचा रंग कोणता?’ या प्रश्नाचे उत्तर नववीचे विद्यार्थीसुद्धा ‘निळा’ असेच देतात कारण विचारलेल्या प्रश्नाचे एकच उत्तर देण्याची सवय! ‘झाडाच्या पानांचा रंग कोणता?’ या प्रश्नावर विचार करून वेगवेगळे उत्तर देण्यासाठी विद्यार्थ्यांना विलक्षण धाडस दाखवावे लागते, हे अनेक शाळांमध्ये दिसले आहे. अशा प्रश्नाला ‘पिवळा’, ‘राखाडी’ अशी उत्तरे देऊ इच्छिणारे मोजके विद्यार्थी-विद्यार्थिनी फारच घाबरलेले असतात. ‘घोका आणि ओका’ या सवयीमुळे वेगळा विचार करण्याची सवय मुला-मुलीना नसते. झाडाचे रोप कसे लावावे, मोहरी जमिनीत पेरल्यावर काय होईल, मटकीला मोड कसे येतात, हे शिक्षण पुस्तकामधून घ्यायचे नसते, त्याचे प्रयोग घरीच करून बघायचे असतात. विज्ञान शिकण्याच्या तासाला चढ उतार असलेल्या पृ÷भागावर एकमेकांना ढकलण्याचा प्रयोग सर्व मुलांनी केल्यास ऊर्जा, बल यामधले विज्ञान विद्यार्थ्यांना उत्तम समजेल. वर्गातील एक बाक चार विद्यार्थी कशाप्रकारे हलवू शकतात, एक विद्यार्थी का हलवू शकत नाही, याचे प्रात्यक्षिक वर्गात झाल्यानंतर न्यूटनचे गतीविषयक नियम शिकवले तर समजू शकतात. वेगवेगळय़ा वजनाची मुले झोपाळय़ावर बसल्यानंतर न्यूटनचा दुसरा नियम पटकन समजू शकतो. सायकलचे पायडल मारल्यानंतर मागचे चाक फिरते आणि त्या चाकामुळे पुढचे चाक कसे फिरते, हे सायकलवर बसल्यावर समजेल आणि न्यूटनचा तिसरा नियम पाठ करावा लागणार नाही.
विज्ञान शिकण्याची आवड लागण्यासाठी नेहमी प्रश्न विचारण्यास मुला-मुलींना प्रवृत्त करणे गरजेचे आहे. एकाच विषयावर वेगवेगळी मते व्यक्त करून त्यासंबंधी चर्चा करण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन शाळेत मिळाले तर आपोआप विज्ञानाची वृत्ती जोपासली जाईल. ‘सार्वजनिक ऊत्सवाचे फायदे-तोटे’, ‘ग्रहणाविषयी समज-गैरसमज’, ‘सापांविषयी समज-गैरसमज’, ‘शाकाहार आणि मांसाहार याचे फायदे-तोटे’ अशा विषयांवर दोन्ही बाजूंचा विचार करणाऱया वाद-विवाद स्पर्धा कोणत्या शाळेत आयोजित केल्या जाऊ शकतात. ‘घरामध्ये नवीन कार किंवा दुचाकी आणल्यावर त्याची पूजा का करावी?’, ‘गणपतीची मूर्ती घरात आणताना स्त्रीच्या हातात का नसते?’, ‘मुंज म्हणजे काय, फक्त मुलाचीच मुंज का केली जाते?’, ‘डावखुरे असण्यात काय गैर आहे?’, ‘शेंगदाणे उपवासाला खाऊ शकतो परंतु शेंगतेल का खाऊ शकत नाही?, ‘शाबूदाणा कसा बनवतात?’, ‘उपवासाला इतके खाल्ले तर कसे चालते?’ असे प्रश्न विचारण्यास घरामध्ये खुले वातावरण असल्यास मुले तर्कनि÷ विचार करू शकतात. ‘देवाची करणी आणि नारळात पाणी’ असे वाकप्रचार कानावर पडल्यामुळे कुतूहल थांबते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल नसेल तर पुढे भारतामध्ये शोध कसे लागणार? ‘वर्गात चर्चा सुरु असताना अनौपचारिक वातावरण असावे, चर्चेत भाग घेण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे’ अशा सूचना बालभारती पुस्तकामध्ये शिक्षकांसाठी दिलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात पाच टक्के शाळांमध्येही होत नाही. तर्कशास्त्र आणि कुतूहलाचा अभाव असल्यामुळे एकूणच वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या अभावाचे प्रतिबिंब घरोघरी, शाळांमध्ये आणि समाजामध्ये दिसते. त्यामुळेच विज्ञान परिषदेमध्ये दुष्ट प्रवृत्तीना रोखण्यासाठी रांगोळय़ा काढल्या जातात, हळदी-कुंकू समारंभ घडतात.
विद्यार्थ्यांनी तर्कनि÷ व विवेकबुद्धीने विचार करावा, असे विज्ञानाच्या पुस्तकामध्ये लिहिले आहे परंतु त्याची अंमलबजावणी किती शाळांमध्ये आणि किती घरांमध्ये होत असते? ‘कुकरच्या शिट्टीमुळे कुकरमधला भात शिजतो की हवेच्या प्रेशरमुळे?’, ‘चहाचे पाणी उकळते तसे तेल उकळते का?’, ‘दात ब्रशमुळे स्वच्छ होतात की टूथपेस्टमुळे?’, ‘सतार, सारंगी आणि बासरी यांच्या आवाजामध्ये काय फरक आहे?’, ‘ब्रेड, खारी, बिस्किटे, कागद, कापड, कसे तयार करतात?’ अशा रोजच्या आयुष्यातील प्रश्नांवर विज्ञानाच्या तासाला चर्चा होण्याची गरज आहे. अशी चर्चा शाळेत होत नसल्यास पालकांनी घरामध्ये अशी चर्चा घडवून आणणे आवश्यक आहे. परंतु पालकांचाच शास्त्रीय दृष्टीकोन आहे का? आठवी-नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांशी किती घरांमध्ये लैंगिक शिक्षणासंबंधी, शरीरशास्त्रावर चर्चा होत असते? आजही अनेक शाळांमध्ये दहावीच्या पुस्तकातील शरीरशास्त्राविषयीचे धडे चर्चेविना शिकवले जातात.
‘मानवी प्रजनन संस्था’ याविषयी धडा वाचन झाल्यानंतर बऱयाच शाळांमधील मुली त्यांच्या मनातील प्रश्न शिक्षिकांना खुलेपणाने विचारू शकत नाहीत. पौगंडावस्थेत पडणारे मनातले अनेक प्रश्न अनेक मुले-मुली शाळेत किंवा घरामध्ये खुलेपणाने विचारू शकत नाहीत. त्यामुळे प्रजनन, मासिक पाळी, लैंगिक संबंध यासंदर्भात अज्ञान, सामाजिक प्रथा-रूढी-परंपरा, संकोच यामुळे या महत्त्वाच्या विषयात गैरसमज पसरण्याची शक्मयता अधिक असते.
कोणत्याही शाळेचा दर्जा कमीत कमी वेळेत जोखायचा असेल तर काय बघावे? शाळेची प्रयोगशाळा, शाळेचे वाचनालय आणि शाळेचे स्वच्छतागृह. शाळेची प्रयोगशाळा किंवा वाचनालय बघण्याची इच्छा व्यक्त केल्यावर अजूनही अनेक शाळांमध्ये ‘लॉकडाऊन’चे कारण सांगितले जाते. अनेक शाळांतील प्रयोगशाळांची अवस्था भीषण आहे. याचे कारण शालेय संस्थांमध्ये असलेला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव. ‘विज्ञानाविषयी अनेक बाबी वाचून समजण्यापेक्षा निरीक्षणाने सहज लक्षात येतात’ असे सहावीच्या पुस्तकामध्ये ‘शिक्षकांसाठी’ असलेल्या सूचनांमध्ये नमूद केले आहे. असे निरीक्षण करण्यासाठी शाळेमध्ये अद्ययावत प्रयोगशाळा असणे गरजेचे आहे. परंतु अनेक शाळांमधील वाचनालये आणि प्रयोगशाळा कुलुपबंद अवस्थेत आहेत. याची कुलुपे काढून मनाची कवाडे आपण सर्वांनी उघडली आणि प्रश्न विचारणाऱयांना प्रोत्साहन दिले तरच समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासला जाईल.
-सुहास किर्लोस्कर