राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आता जय सियारामचा घोष : हरियाणाच्या रेवाडी येथे सभा
► वृत्तसंस्था/ रेवाडी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरियाणाच्या रेवाडीमध्ये विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले आहे. यावेळी आयोजित जाहीर सभेला मोदींनी संबोधित केले आहे. 2013 मध्ये भाजपने मला पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केल्यावर माझा पहिला कार्यक्रम रेवाडी येथे झाला होता आणि रेवाडीने मला 272 पारचा आशीर्वाद दिला होता. जनतेच्या या आशीर्वादामुळे आम्ही स्वबळावर बहुमत गाठले होते. आता मी पुन्हा रेवाडी येथे आलो असून जनतेचा आशीर्वाद ‘अबकी बार एनडीए सरकार 400 पार’ असा असल्याचे वक्तव्य मोदींनी केले आहे.
अयोध्येत भव्य राम मंदिर उभारले जावे अशी देशाची इच्छा होती. आज पूर्ण देश भव्य राम मंदिरात विराजमान रामलल्लाचे दर्शन घेत आहे. काँग्रेसचे नेते भगवान रामाला काल्पनिक ठरवत होते. राम मंदिर उभारण्यास विरोध करणारे काँग्रेस नेते देखील आता जय सियाराम म्हणू लागले आहेत. काँग्रेसमधून एक-एक नेता पक्ष सोडून जात आहे. काँग्रेसकडे आता स्वत:चे कार्यकर्ते देखील शिल्लक राहिले नाहीत. स्वत:चे सरकार असलेल्या ठिकाणी काँग्रेसला सरकारं देखील सांभाळता येत नसल्याची स्थिती आहे. एका परिवाराच्या मोहापायी काँग्रेस आज स्वत:च्या इतिहासातील सर्वात दयनीय अवस्थेला सामोरा जात आहे. काँग्रेसच्या नेत्याला स्वत:चा एक स्टार्टअप सांभाळत येत नाही आणि तो देश सांभाळण्याची स्वप्ने पाहत असल्याची उपरोधिक टीका मोदींनी केली आहे.
तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था
युएई आणि कतारमध्ये आज ज्याप्रकारे भारताला सन्मान मिळतो, प्रत्येक कानाकोपऱ्यातून भारताला शुभेच्छा प्राप्त होता, हा सन्मान केवळ मोदीचा नाही, तर हा सन्मान भारतीयांचा आहे. 10 वर्षांमध्ये भारत 11 व्या क्रमाकांवरून आता 5 व्या क्रमांकाची आर्थिक महाशक्ती ठरला आहे. आता माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती करण्यासाठी जनतेचा आशीर्वाद हवा असे मोदींनी म्हटले आहे.
काँग्रेसचा इतिहास घोटाळ्यांचा
भाजप सरकारने आज एम्सच्या कार्याचा शुभारंभ केला आहे. आम्ही लोकार्पडा देखील करू. यामुळे लोकांना उत्तम उपचार मिळतील आणि युवांना डॉक्टर होण्याची संधीही मिळणार आहे. रोजगार आणि स्वयंरोजगारच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचा इतिहास हा देशाच्या निम्म्या लोकसंख्येला दशकांपर्यंत छोट्या गरजांपासूनही दूर ठेवण्याचा आहे. काँग्रेसचा इतिहास केवळ एकाच परिवाराचे हित देशहितापेक्षा सर्वोपरि मानण्याचा आहे. काँग्रेसचा इतिहास घोटाळ्यांचा आहे. सैन्य आणि सैनिक दोघांनाही कमजोर करण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे. काँग्रेसची टीम, नेता आणि वृत्ती आजही तीच असल्याने या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असल्याचे मोदी म्हणाले.
हरियाणा विकसित होणे आवश्यक
विकसित भारत होण्यासाठी हरियाणा विकसित होणे अत्यंत गरजेचे आहे. हरियाणातील रस्ते आधुनिक झाले, येथील रेल्वेचे जाळे आधुनिक झाले तरच हे शक्य आहे. राज्यात मोठमोठी रुग्णालये उभारण्याची गरज आहे. काही वेळापूर्वी हरियाणाला 10 हजार कोटी रुपयांचे विकासप्रकल्प सोपविण्याची संधी मिळाली आहे. भगवान रामाच्या कृपेने सध्या मला प्रत्येक ठिकाणी अशा पवित्र कार्याशी जोडून घेण्याची संधी मिळत असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.