मराठी माणसाच्या हितासाठी जन्माला आलेल्या शिवसेनेची महाराष्ट्र मुलुखातील आजची अवस्था केविलवाणी झाली आहे. शिवसेनाप्रमुखपदी बाळासाहेब ठाकरे असताना केवळ मुंबईतच नव्हे तर राज्याच्या अनेक भागात शिवसेनेचा दरारा होता. सगळय़ाच पक्षांचे नेते बाळासाहेबांना टरकून होते. त्यामागे बाळासाहेबांचे कर्तृत्व आणि करारी व्यक्तिमत्व तर होतेच, पण सत्तेसाठी कोणतीही लाचारी पत्करायची नाही, आपला कणा ताठ ठेवायचा. विरोध उघडपणे करायचा, मात्र अंतःकरणात शत्रूत्वाचे विष ठेवायचे नाही. स्वतःचे नव्हे तर लोकांचे हित पाहायचे आणि सत्ता मिळाली तरी आपण तिचे उपभोगशून्य स्वामी व्हायचे, हे त्यांचे धोरण होते. त्यामुळे मनोहर जोशी, नारायण राणे यांच्यासारख्या नेत्यांना त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर म्हणजे मुख्यमंत्रीपदावर बसवले. तथापि, त्यांच्यावर अंकूश ठेवलाच. बाळासाहेबांचे हे थेट, कठोर आणि मर्मभेदी धोरण त्यांच्या करारीपणाचे दर्शन घडवणारे होते. महाराष्ट्रात चंचूप्रवेश करायचा तर शिवसेनेला, पर्यायाने बाळासाहेबांना डावलता येणार नाही, हे भाजपचे नेते जाणून होते. दिवंगत प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी बाळासाहेबांना योग्य पद्धतीने हाताळत सत्तासोपान पादाक्रांत केला होता. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी वेळोवेळी बाळासाहेबांचा सल्ला घेतलेला होता, इतकी त्यांची प्रतिमा आणि बुद्धिमत्ता प्रखर होती. दुसरीकडे, पंचायतराज व्यवस्थेतील प्रत्येक टप्प्यात आपलीच सत्ता असली पाहिजे, या एकाच हेतूने आयुष्यभर राजकारण करणाऱया शरद पवार यांच्यासारख्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या नेत्याला शिवसेनेची आक्रमकता, अकांडतांडव संपवायचे होतेच. ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, नगरपालिका, मनपा, जिल्हापरिषद, विधीमंडळ अशा सगळय़ा ठिकाणी वाट्टेल ती भूमिका घेऊन सत्तासोपान काबीज करण्याचेच ध्येय पवार यांनी आयुष्यभर ठेवले आणि त्यात ते बऱयापैकी यशस्वी झाले. शिवसेना संघटना असताना राजकीय लाभासाठी त्यांनीच तिला पक्षाचे स्वरूप द्यावे, असा सल्ला बाळासाहेबांना दिला होता. मात्र, संघटनेचा पक्ष झाल्यानंतर पवार यांचे हेतू सफल होणे दुरापास्त झाले. त्यामुळे शिवसेना संपवण्यासाठी त्यांनी त्यांच्या शैलीत पेरणी करायला सुरूवात केली. त्यांच्या डोळय़ापुढेच वाजपेयी-अडवाणींचे भाजपमधील महत्त्व संपले आणि महाजन-मुंडे यांचा अकाली मृत्यू झाला. शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांचा महाबळेश्वर अधिवेशनात राज्याभिषेक झाला आणि केवळ बाळासाहेबांचे पुत्र असल्यामुळे वारसाहक्काने ते शिवसेना पक्षप्रमुख झाले. कलावंत म्हणून उद्धव सहृदय असले तरी राजकीय डावपेच, वक्तृत्व आणि अचूक निर्णयक्षमता या गोष्टी वारसा म्हणून मिळत नसतात. त्या कमवाव्या लागतात. त्यांच्या वागण्याने आधी राज ठाकरे, मग नारायण राणे दुखावले. शिवसेनेबाहेर पडले. छगन भुजबळांनी आधीच पक्ष सोडला होता. मग गणेश नाईकही बाहेर पडले. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी सावध व्हायला हवे होते. तथापि, स्वतःवरील प्रेम त्यांना नडले. या सगळय़ात पवार यांची विविधांगी पेरणी होतीच. घरगुती जवळीक, कौटुंबिक जिव्हाळा वेगळा आणि राजकारणातील निर्दय डावपेच वेगळे असतात हे उद्धव ठाकरेंच्या ध्यानात आले नाही. दुसरीकडे, हे सगळे पाहत आणि अनुभवतच देवेंद्र फडणवीस मोठे होत गेले. अगदी एकनाथ खडसेंसारख्या स्वपक्षीय विरोधकाचा त्यांनी ज्या पद्धतीने बंदोबस्त केला तो पाहता शरद पवारांचा राजकीय वारसा चालवण्याचा धूर्तपणा त्यांच्याठायी असल्याचे राज्याने पाहिले. विशेष म्हणजे, देवेंद्र, पंकजाताई आणि खडसे हे सगळेच गोपीनाथ मुंडे यांच्या गटाचे मानले जातात. शिवसेनेची रेघ लहान करण्यासाठी त्यांनी स्वतःची रेष मोठी करण्यास प्रारंभ केला. शिवाय पवार यांनी वेळोवेळी केलेल्या खेळी संजय राऊत यांच्यासारख्या मध्यस्तांमार्फत पवारांना हव्या तशा फलद्रुप होत होत्या. मुख्यमंत्रीपदासाठी भाजपशी असलेली नैसर्गिक युती मोडून उद्धव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेला घरोबा कुणालाच पसंत नव्हता. त्यातही शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद दिले असते तर फारशी चर्चा झाली नसती, पण स्वतः ते पद घेऊन, राजकारणात ‘अजाण’ असणाऱया आपल्या पुत्राला मंत्रीपद दिले. त्यातून शिवसेनेमध्ये अस्वस्थता वाढत होती. उद्धव यांच्या अपरिपक्व ‘किचन कॅबिनेट’चे भलते सल्ले हे सारे शिवसेना पक्षाला घातक ठरत गेले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा चाणाक्ष नेता हे न्याहाळत होता. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन स्वतःकडे उपमुख्यमंत्रीपद घेण्याची त्यांची चाल अतिशय सावध आहे. पद शिंदेंकडे असले तर सत्तेची चावी आपल्याकडे असेल, याची खबरदारी ते ताकास तूर लागू न देता घेतील. सिंहाला राज्याभिषेकाची गरज नसते, असे चाणक्मयाचे वचन आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कोणताही आला तरी शिवसेनेचा निकाल लागला आहे. सत्तेसाठी पक्ष फोडणारे शिवसेना नेते उद्या मंत्रिपदासाठी भाजपमध्ये प्रवेश करणारच नाहीत, असे नाही. कारण स्वतः उद्धव ठाकरे यांनीच ‘आता नाही तर कधीच नाही’ अशी भाषा करीत मुख्यमंत्रीपद उपभोगले. ज्या पद्धतीने त्यांना त्या पदावरून पायउतार व्हावे लागले ते दुःखद होते, पण शेवटी राजकारणात भावनेला किंमत नसते. शिवसेना संपवण्यासाठी किंवा तिचे महत्त्व कमी करण्यासाठी शरद पवार यांनी केलेल्या पेरणीचा देवेंद्र फडणवीस यांना फायदा होत आहे, कारण त्यांनी तर थेट सुरूंगच लावला आहे. ‘सत्तातुराणां न भयम् न लज्जा’ अशी नवी म्हण निर्माण झाली आहे आणि त्यासाठी पक्षनि÷sला लाथ मारणाऱयांची सध्यातरी चलती आहे. महाराष्ट्रातील राजकारण उत्तरप्रदेश किंवा बिहारपेक्षा भेदक वळणावर जाऊन पोचणार असल्याची ही चिन्हे आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना अपेक्षित असेच सारे घडत आहे. देवेंद्र फडणवीस यांना मात्र ताकसुद्धा फुंकून प्यावे लागणार आहे, यात शंका नाही.
Previous Articleलोकसंख्या नियंत्रणासाठी तूर्तास कायदा नाही!
Next Article जम्मू-काश्मीरमध्ये 7 दहशतवाद्यांना अटक
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.