रस्ते खोदकामावरून गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र
प्रतिनिधी/ पणजी
राज्याची देखणी राजधानी म्हणून पणजीकडे आपण आतापर्यंत पाहत आलेलो आहोत. परंतु सध्या याच पणजीत बेसुमार रस्त्याचे खोदकाम करण्यात आल्याने राजधानीला बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या कामामुळे प्रत्येक जागी ख•s खणले आहेत. याचा परिणाम जनजीवनावर होत आहे. खणलेले ख•s व उखडलेले रस्ते यामुळे पणजीत धूळ प्रदूषण वाढीस लागले आहे. पणजीत अनेक ठिकाणी शाळा असल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही परिणाम झालेला आहे. पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांच्या मतदारसंघातही तीच अवस्था आहे. त्यामुळे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने धूळ प्रदूषण रोखण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली.
गिरीश चोडणकर यांनी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठवून पणजीत वाढलेले धूळ प्रदूषण रोखण्याकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, पणजी शहरासह गोवा राज्यात विविध ठिकाणी चालणाऱ्या रस्ते खोदकाम अस्ताव्यस्त करण्यात येत आहे. पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल प्रतिनिधित्व करीत असलेल्या कुडचडे शहरातही याच पद्धतीने कामे चालल्याने लोकांच्या जनजीवनावर परिणाम झालेला आहे. शहरातील रहिवाशांना आणि प्रवाशांना प्रचंड गैरसोय आणि त्रास होत आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसतो. खोदलेले ख•sही काम पूर्ण होऊनही नीट भरले जात नसल्याने ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला चिखल साचला आहे. यातच भरीस भर म्हणून धुळीचा निपटारा करण्यासाठी आवश्यक पाण्याचा शिडकावाही केला जात नसल्याने आता गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानेच लक्ष घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
खणलेल्या खड्यांमुळे रोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने यात लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन एकाचवेळी सर्व रस्ते खोदणे टाळावे, अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी आपल्या पत्रातून केली आहे.
खाद्यपदार्थही धुळीने माखले
पणजीत अनेक हातगाडे व छोटे हॉटेल व्यावसायिक, भोजनालये आहेत. खोदकामामुळे या ठिकाणच्या खाद्यपदार्थावरही धूळ बसत आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. धुळीचे कण खाद्यपदार्थाद्वारे पोटात जात असल्याने याचा त्रास काही वृद्धांना व मुलांना होत असल्याचे लोकांतून बोलले जात आहे. त्यामुळे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर उपाययोजना काढावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली.
कडक कारवाई करा…
शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत खोदकामे सुरू आहेत. परंतु या कामासाठी वायू आणि जल प्रदूषण होत नाही याची खात्री करण्यासाठी कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नाही. शिवाय आवश्यक परवानगी न घेता ही कामे केली जात असल्याचा संशय असल्याने होणाऱ्या प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात घेता राज्यातील जनतेला प्रदूषणमुक्त हवा आणि पाणी मिळावे यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने योग्य ती उपाययोजना आखावी. तसेच संबंधित खात्यांच्या आवश्यक पूर्वपरवानगी न घेतल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी पत्राद्वारे केली आहे.