जिल्हा प्रशासनाला निवेदन
प्रतिनिधी/कोल्हापूर
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात गेल्या काही महिन्यांपासून अनागोंदी कारभार सुरु आहे. लाभार्थ्यांच्या काही तांत्रिक अडचणी मुंबई मुख्यालयाकडून पूर्ण होत नाहीत. त्यासाठी त्यांना मुंबईला जावे लागत आहे. त्याचबरोबर सहा महिने झाले तरी लाभार्थ्यांना कर्जाच्या व्याजाचा परतावा मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजातील तरुण अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. तरी या अनागोंदी कारभाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शिवसेना (उध्दव ठाकरे गट) शिष्टमंडळाने सोमवारी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली.
जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात म्हंटले आहे की, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजासाठी बिनव्याजी कर्ज योजना राबविण्यात येत आहे. जेणे करून मराठा समाजातील बेरोजगार तरूण-तरूणींना व्यावसाय करण्यास प्रोत्साहन मिळावे हा उद्देश आहे. यापूर्वी या महामंडळावर अध्यक्ष म्हणून नरेंद्र पाटील व उपाध्यक्ष म्हणून मी संजय पवार काम करत असताना कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्हयांमध्ये दौरे केले. या माध्यमातून महामंडळाचा प्रचार व प्रसार करून अनेक मराठा उद्योजक तयार होण्यासाठी प्रयत्न केले, त्यामुळे हजारो मराठा उद्योजक तयार होऊन स्वःताचा विविध व्यवसाय करू लागले आहेत.
परंतु गेल्या काही महिन्यांपासून या महामंडळात अनागोंदी कारभार चालु आहे. लाभार्थ्यांच्या काही तांत्रिक अडचणी मुंबई मुख्यालयाकडून पूर्ण होत नाहीत, प्रसंगी लाभार्थ्यांना मुंबईमध्ये जाऊन त्या अडचणी सोडवून घ्याव्या लागत आहेत. तसेच सहा/सहा महिने लाभार्थ्यांना व्याजपरतावा मिळत नाही, त्यामुळे मराठा समाजातील तरूण-तरूणी अक्षरशः मेटाकूटीला आले आहेत. कोल्हापूर जिल्हयात 3500 लाभार्थ्यांचा गेल्या 6 महिन्यांपासूनचा व्याजपरतावा जमा झाला आहे. हे सरकार सर्वच बाबती मराठा समाजाकडे दुर्लक्ष करत आहे. याचा परिणाम महामंडळावरही होत आहे.
शिष्टमंडळात जिल्हा प्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले, अवधूत साळोखे, विशाल देवकुळे, युवराज खंडागळे, अक्षय ओतारी, सागर साळोखे, दीपाली शिंदे, अभिजीत बुकशेट, सागर पाटील आदींचा समावेश होता.