पुणे / प्रतिनिधी :
राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी अद्याप रास्त आणि किफायशीर भावाची (एफआरपी) पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना अदा केलेली नाही, त्या कारखान्यांना नोटीसा पाठवा आणि ऊस तुटल्यापासून पंधरा टक्के व्याजाप्रमाणे जी काही रक्कम होईल, ती व्याजासकट शेतकऱ्यांना द्या, अशी जोरदार मागणी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मंगळवारी साखर आयुक्तांकडे केली.
साखर आयुक्तांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शेट्टी म्हणाले, राज्यातला उसाचा गाळप हंगाम जवळपास संपत आलेला आहे. 145 साखर कारखाने बंद झालेले आहेत आणि 55 अद्याप सुरू आहेत. परंतु, या आठ-दहा दिवसांमध्ये तेही बंद होतील. अशा परिस्थितीमध्ये एकूण किती शेतकऱ्यांची एफआरपी अदा करण्यात आली आहे, याची माहिती घेण्यासाठी मी साखर आयुक्तालयात आलो होतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक शेतकरी मला फोन करतात. आमचे उसाचे पैसे मिळाले नाहीत, अशी तक्रार करतात. त्यामुळे साखर आयुक्तालयाकडे नेमकी याबाबत काय माहिती आहे, त्यांनी यासाठी काय केले आहे, याविषयी चौकशी करण्यासाठी मी आलो होतो. साखर आयुक्तांनी अंदाजे 92 टक्के एफआरपीची रक्कम अदा केली असून आठ टक्के रक्कम राहिलेली असल्याचे सांगितले आहे. याचा अर्थ आठ टक्के एफआरपीची रक्कम थकीत आहेत.
या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तांना आम्ही निवेदन दिले आहे. ज्या कारखान्यांकडे आठ टक्के एफआरपीची रक्कम राहिलेली आहे, त्यांना नोटीस पाठवा आणि पंधरा टक्के व्याजाप्रमाणे ऊस तुटल्यापासून जी काही रक्कम होईल ती व्याजासकट शेतकऱ्यांना मिळावी, अशी विनंती आपण केली आहे. त्यावर व्याजाचीही आकारणी करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. खरे तर साखर कारखान्यांवर आमचा विश्वास नाही. आम्ही एक रकमी एफआरपीची मागणी नेहमी करत असतो. कारखाने रक्कम देणार नसतील, तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही शेट्टी यांनी या वेळी दिला.