नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
इस्रायली सॉफ्टवेअर पेगाससच्या माध्यमातून देशातील अनेक नेते आणि पत्रकारांचे फोन टॅप केल्याची बाब समोर आली. यासंदर्भात विरोधकांनी संसदेत गदारोळ घातला. त्यामुळे अनेकवेळा सभागृह स्थगित करण्यात आलं. याप्रकरणी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव यांनी हेरगिरीचे आरोप फेटाळून लावले आहेत.
पेगासस फोन टॅपिंग प्रकरणी केंद्र सरकारकडून केंद्रीय इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत स्पष्टीकरण दिलं. हेरगिरीशी डेटाचा काहीही संबंध नाही. फोन टॅपिंग केवळ देशाचे हित आणि सुरक्षिततेच्या बाबतीत केलं जातं. जो अहवाल सादर करण्यात आला आहे, त्यातील तथ्य हे दिशाभूल करणारं आहे,असं आश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितलं.
या अहवालातच म्हटलं आहे की यादीत नंबर आहेत याचा अर्थ हेरगिरी केली असा होत नाही, असं देखील आश्विनी वैष्णव म्हणाले.वैष्णव यांनी सदस्यांशी संबंधित तथ्य तपासून तार्किकदृष्ट्या समजून घेण्याचं आवाहन केलं. ज्यांनी संबंधित बातमी तपशीलवार वाचली नाही अशांना आपण दोष देऊ शकत नाही, असं वैष्णव म्हणाले.