आयएएनएस-सी व्होटरच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकाराच्या विरोधात देशातील लोकांची नाराजी अत्यंत कमी प्रमाणात आहे. मात्र राज्य सरकारांविरोधात लोक अधिक प्रमाणात नाराज आहेत, असा निष्कर्ष आयएएनएन आणि सी-व्होटर या संस्थांनी काढला आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे.
नाराजीचे एकंदर प्रमाण पाहता देशभरात राज्य सरकारांवर नाराजी असणाऱयांची संख्या 46.6 टक्के, तर केंद्र सरकारवर नाराजी असणाऱयांची संख्या केवळ 34.8 टक्के इतकी आहे. राज्यांमधील मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर अतीनाराजी असणाऱयांची संख्या 24.6 टक्के तर केंद्र सरकारविरोधात अतीनाराजी असणाऱयांची संख्या 17.9 टक्के इतकी आहे, असे सर्वेक्षात स्पष्ट झाले आहे.
कोरोना काळातील अनुभव
कोरोना उद्रेकाच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये तणाव दिसून आला होता. कोरोनाच्या पहिल्या उद्रेकात केंद्र आणि राज्ये यांनी एकमेकांवर अकार्यक्षमतेचे आरोप केले होते. दुसऱया उद्रेकातही हाच अनुभव आला होता. विशेषतः कोरोनाच्या भीतीमुळे अनेक महानगरांमधून लोकांनी मोठय़ा प्रमाणात आपल्या गावी जाण्यास प्रारंभ केला होता. त्या काळात राज्य सरकारांनी त्यांची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला होता व केंद्र सरकार या परिस्थितीला जबाबदार आहे, असा आरोप केला होता, असे हे सर्वेक्षण सांगत आहे.
विरोधी पक्षांचा सुधारणांना विरोध
2014 नंतर देशातील विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या प्रत्येक सुधारणावादी धोरणांना विरोध केला आहे. कृषी कायदे असोत किंवा कामगार कायदा सुधारणा असोत, विरोधी पक्षांनी केवळ या सुधारणांना विरोध करण्याचेच काम केले आहे. या संदर्भात लोक विरोधी पक्षांवर नाराजही असल्याचे दिसून आले आहे.
मुख्यमंत्र्यांची परिस्थिती
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात 35.4 टक्के मतदार नाराज आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधातील नाराजीचे प्रमाण 33.1 टक्के इतके आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधात 32 टक्के मतदार नाराज आहेत. केजरीवाल यांच्या विरोधात नाराजीचे प्रमाण 28 टक्के असून उत्तर प्रदेशात 41.8 टक्के मतदार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात नाराज आहेत असा निष्कर्ष या सर्वेक्षणात काढण्यात आला आहे.
लोकप्रिय मुख्यमंत्र्यांना आमदारांचाच विरोध
देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच पक्षाच्या आमदारांचा विरोध असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. तसेच लोक केवळ मुख्यमंत्र्याला महत्व देण्यापेक्षा संपूर्ण मंत्रिमंडळाची कामगिरी लक्षात घेऊन सरकारांचे मूल्यमापन करतात असेही आढळल्याचे हे सर्वेक्षस सांगते. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आजही कायम आहे. ती केवळ तामिळनाडू, केरळ आणि पंजाब या राज्यांमध्ये कमी आहे. इतर सर्व राज्यांमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात कमीत कमी नाराजी दिसून आलेली आहे, असाही महत्वाचा मुद्दा या सर्वेक्षणात समोर आल्याचे पहावयास मिळत आहे.