आरोग्याची वेळीच काळजी घेण्याचे आवाहन : प्राथमिक आरोग्य केंद्रांनेही लक्ष देण्याची गरज : परिसरात पाणी साचू न देणेच हिताचे
प्रतिनिधी /येळ्ळूर
येळ्ळूरमध्ये डेंग्यूसह इतर आजारांनी अनेकजण त्रस्त झाले आहेत. हा आजार आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य खात्याने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. पाटील गल्ली परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. याचबरोबर टायफाईड, फ्ल्यू यासह इतर संसर्गजन्य आजारांमुळे अनेकजण त्रस्त झाले आहेत. तेव्हा आरोग्य विभागाने आता लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
येळ्ळूर परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. यासाठी जनतेने आता खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक भागांतील गटारीमधील पाण्याचा निचरा होणे कठीण बनले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. तेव्हा सर्वसामान्य जनतेने पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोणताही आजार झाल्यास तातडीने रक्तचाचणी करून निदान करणे गरजेचे आहे.
येळ्ळूरमधील अनेकांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामधून काहीजण बरे झाले आहेत. तर काहीजण उपचार घेत आहेत. डेंग्यूची लागण होण्यामागे पाण्याची समस्याच कारणीभूत आहे. अस्वच्छ पाण्यातूनच डेंग्यूचा डास तयार होतो. त्यासाठी वारंवार पाणी बदलत राहणे महत्त्वाचे आहे. याचबरोबर घराच्या परिसरात डबके किंवा कोठेही पाणी साचून राहिले तर तातडीने ते पाणी काढले पाहिजे. आता पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे घरच्या बाजुला किंवा परसात पाणी साचू नये यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.
डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती ही साठवलेल्या पाण्यातून होते. पाणी साठविण्यासाठी टाकी किंवा बॅरेल, पाण्याचे पिंप यांचा वापर केला जातो. पण आता हे सर्व धोक्याचे ठरू लागले आहे. तेंव्हा जनतेने तीन दिवसांतून एकदा ते पाणी उपसा करून पुन्हा नव्याने पाणी भरणे गरजेचे आहे. अन्यथा डेंग्यू डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता अधिक आहे. डेंग्यूबरोबरच कॉलरा, चिकुनगुनिया आणि टायफाईडसारख्या आजाराने अनेकजण हैराण झाले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर व कर्मचारी जनतेला स्वच्छता राखण्याचे आवाहन करत आहेत तर स्वच्छता कशाप्रकारे करावी, याची माहिती देण्यासाठी आल्यास त्यांना सहकार्य करणेदेखील महत्त्वाचे आहे. कारण मागीलवषी कर्मचारी घरी गेले असताना त्यांच्याशी उद्धट बोलण्याचा प्रकार घडला होता.
ग्रामस्थांनी सहकार्य करणे गरजेचे
काही गल्ल्यांमधील गटारी, कचरा आणि पाण्याने तुंबल्या आहेत. त्या गटारी मध्यंतरी साफ करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काही जणांनी गटारीवरील फरशी व काँक्रीट काढण्यास मनाई केली. यामुळे अनेक ठिकाणी कचरा तसाच साचून आहे. वास्तविक सर्वांनी ग्रा. पं.ला सहकार्य करणे गरजेचे आहे. ग्रा. पं. नेही याबाबत मार्गदर्शन करून गटारी साफ करण्याची गरज निर्माण झाली आहे.
संघटितपणे काम करणे आवश्यक
साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवायचे असेल तर येळ्ळूरवासियांनी संघटितपणे काम करणे गरजेचे आहे. डासांचा प्रतिबंध करायचे असेल तर परिसरातील कचराही साफ होणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचा काहीच उपयोग होणार नाही.
ताप आल्यास तातडीने उपचार घ्या!
अंगदुखी किंवा ताप आल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार विविध वैद्यकीय चाचण्या तातडीने कराव्यात. कारण डेंग्यू व कॉलरासारखा आजार हा गंभीर असतो. ग्राम पंचायतीनेही डासांचे निर्मूलन करण्यासाठी औषधांची फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.
प्रत्येकाने झोपताना मच्छरदाणीचा वापर केला पाहिजे. अन्यथा अशा आजारांचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी प्रत्येकानेच दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
संपूर्ण गावात औषध फवारणी करावी
कलमेश्वर गल्ली तसेच परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे. मात्र संपूर्ण गावामध्येच अशी फवारणी झाली तर त्याचा फायदा होणार आहे. अन्यथा पुन्हा डासांची उत्पत्ती होणार आहे. त्यासाठी ग्राम पंचायतीने जातीने लक्ष देऊन संपूर्ण गावामध्येच फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.