देशाला, राज्यालाही भाजप हाच एकमेव पर्याय : भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचे मत
पणजी : कर्नाटकात विधानसभा निवडणूक गाजत असतानाच गोव्यातील सांखळी व फोंडा पालिकेवर निर्विवाद वर्चस्व राखण्यात भाजपला यश आले आहे. हे यश केवळ पक्षाचे नसून, कार्यकर्ते व जनता यांचे आहे. फोंडा व सांखळीच्या निकालाने भाजपवर जनतेचे प्रेम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. देशाला व राज्यालाही भाजप हाच एकमेव पर्याय असल्याचा दावा गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला. दोन्ही पालिकांवर भाजपची सत्ता आल्यानंतर सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले की, फोंडा व साखळी पालिकेची निवडणूक अस्तित्वाची लढाई मानली गेली. परंतु मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दूरदृष्टीतून चालवलेला राज्याचा विकास हा जनतेसाठी आहे. मुख्यमंत्री सावंत यांची व्यूहरचना व पक्षाच्या नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे भरीव कार्य यामुळे सांखळी व फोंडा येथील पालिकांवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकला आहे.
गोमंतकीय जनता सुज्ञ
विरोधकांनी भाजपवर अनेक आरोप करीत आपले अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न केला. लोकांची दिशाभूलही करण्याचे षङयंत्र रचले गेले. परंतु राज्यातील जनता सुज्ञ आहे. त्यांनी विरोधकांच्या भूल-थापांना बळी न पडता पालिका निवडणुकीत भाजपला खंबीर साथ दिली आहे. राज्यात विरोधकच नसल्याचे आम्ही मानतो. काँग्रेस पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते आपल्याला दिसतच नसल्याचेही तानावडे म्हणाले. कर्नाटकच्या निवडणुकीसंबंधी विचारले असता सदानंद शेट तानावडे म्हणाले, कर्नाटकात जरी विरोधक भाजपवर आरोप करीत असले तरी कर्नाटकचा भरीव विकास हा भाजपनेच केला आहे. तेथील जनताही भाजपला साथ देणार आहे. जनतेवर आम्हाला पूर्ण विश्वास असल्याने कर्नाटकातही भाजप निर्विवाद वर्चस्व प्राप्त करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
फोंडा, सांखळीवासीयांचे आभार
सांखळी आणि फोंड्यातील जनतेने पुन्हा एकदा भाजपवर असलेला विश्वास दाखवून दिला असून, आपण फोंडा व सांखळीवासीयांचे आभार मानतो, असे सदानंद शेट तानावडे म्हणाले.