संजद कार्यकारिणी सभेत नितीशकुमार यांचे प्रतिपादन
पाटणा / वृत्तसंस्था
पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपशी एकत्रित संघर्ष केल्यास जनता विरोधी पक्षांना प्रतिसाद देऊ शकते, असे प्रतिपादन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संयुक्त जनता दल कार्यकारिणीच्या बैठकीत केले आहे. आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहोत, असे संकेत त्यांनी या प्रतिपादनातून दिले आहेत, असे राज्कीय वर्तुळात मानले जात आहे. आपण विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांसमवेत चर्चा करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्व विरोधी पक्षांना भाजपच्या विरोधात एकत्र आणण्याची आपली इच्छा असून त्यासाठी आतापासूनच तयारी केली जाईल. येत्या दोन दिवसांमध्ये आपण दिल्लीला जाणार आहात. तेथे भाजपला विरोध असणाऱया सर्व पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहोत. काही नेते आपल्याला याआधीच भेटून गेले आहेत. देशातील वातावरण विरोधी पक्षांना अनुकूल आहे. मात्र, एकत्र राहणे आवश्यक आहे. एकजूट टिकविल्यास उद्दिष्ट साध्य करणे सहज होईल, असे म्हणणे त्यांनी मांडले.
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत या
नितीश कुमार यांच्या भाषणाच्या आधी संजदच्या पदाधिकाऱयांनी त्यांना राष्ट्रीय राजकारणात उतरण्याचा आग्रह केला. भाजपला पर्याय देण्याची शक्ती नितीशकुमार यांच्यात आहे. त्यांनी आता आपली राजकीय कक्षा विस्तारावी आणि राष्ट्रीय राजकारणात यावे. त्यांना सर्वांचा पाठिंबा मिळेल, असे विचार कार्यकारिणी बैठकीत अनेक वक्त्यांनी व्यक्त केले. मात्र, नितीश कुमार यांनी यासंबंधी त्यांच्या भाषणात भाष्य केले नाही. तरीही ते पंतप्रधानपदासाठी महत्वाकांक्षी आहेत, असे मानले जात आहे. यासंबंधीचे चित्र येत्या काही महिन्यांमध्ये स्पष्ट होणार आहे.
सोनिया गांधींना भेटणार
नितीश कुमार येत्या 5 सप्टेंबरला दिल्लीत काँगेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतील, अशी शक्यता आहे. भाजपविरोधातील संघर्षात आजही काँग्रेस पक्ष महत्वाचा असून त्याच्या समावेशाशिवाय विरोधी पक्षांची एकत्रितता साध्य होणार नाही, असे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत असल्याने नितीश कुमार यांनी सोनिया गांधींना प्रथम भेटण्याचे ठरविले आहे. त्यानंतर ते इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांशीही चर्चा करणार असल्याचे स्पष्ट होत आहे. नितीश कुमार दिल्लींत 3 दिवस वास्तव्यास असतील अशी शक्यता आहे.