वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियात झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीचा आढावा भारतीय क्रिकेट मंडळातर्फे घेतला जाणार आहे. या स्पर्धेत रोहित शर्माकडे संघाचे नेतृत्व तर राहुल द्रविडकडे प्रशिक्षकपद सोपविण्यात आले होते.
1 जानेवारी रोजी भारतीय क्रिकेट मंडळाने या संदर्भात एक बैठक बोलाविली आहे. या बैठकीला द्रविडच्या गैरहजेरीत भारतीय संघाला प्रमुख प्रशिक्षक म्हणून लाभलेले एनसीएचे प्रमुख व्ही. व्ही. एस. लक्ष्मण उपस्थित राहणार आहेत. सदर बैठक मुंबईत होणार असून या बैठकीत 3 जानेवारीपासून सुरू होणाऱया लंका आणि भारत यांच्यातील मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेसंदर्भात चर्चा केली जाईल.
ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून 10 गडय़ांनी दणदणीत पराभव पत्करावा लागला होता. 2013 पासून झालेल्या आयसीसीच्या विविध स्पर्धांमधील भारताची ही सर्वात खराब कामगिरी म्हणावे लागेल. 2013 साली धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स करंडक जिंकला होता. तसेच 2011 साली आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धाही भारताने जिंकली होती.
भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर चेतन शर्माच्या अध्यक्षतेखालील निवड समिती बीसीसीआयने तातडीने बरखास्त केली होती. ही घटना नोव्हेंबरमध्ये घडली. सध्या देशामध्ये राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीवर बीसीसीआयचे लक्ष असून लंकेविरुद्ध 3 जानेवारीपासून सुरू होणाऱया वनडे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. चालू महिन्याच्या प्रारंभी बीसीसीआयने क्रिकेट सल्लागार समितीची नियुक्ती केली होती. आता या समितीची बैठक येत्या शुक्रवारी मुंबईत होणार आहे. या बैठकीमध्ये नव्या निवड समिती सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत चर्चा होणार आहे. नव्या सदस्यांची निवड करण्याकरता माजी क्रिकेटपटू अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुलक्षणा नाईक या तीन सदस्यांचे पॅनेल नियुक्त करण्यात आले आहे.