उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय : ध्वनिक्षेपकाचा आवाज धार्मिक स्थळाबाहेर जाऊ नये
वृत्तसंस्था / लखनौ
दिल्लीत हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित शोभायात्रेवर झालेल्या दगडफेकीनंर उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार सतर्क आहे. उत्तरप्रदेशात कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी योगी सरकारने अधिकाऱयांना नवे दिशानिर्देश दिले आहेत. यानुसार 4 मेपर्यंत सर्व अधिकाऱयांच्या सुटी रद्द करण्यात आल्या आहेत. तर सुटीवर गेलेल्या अधिकाऱयांना 24 तासांमध्ये कार्यालयात हजर होण्यास सांगण्यात आले. अनुमतीशिवाय कुठेच धार्मिक मिरवणुकांच आयोजन राज्यात करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
आगामी दिवसांमध्ये अनेक महत्त्वाचे सण-समारंभ आहेत. ईद आणि अक्षय तृतीया एकाच दिवशी आहे. अशा स्थितीत पोलिसांना अतिरिक्त संवेदनशील रहावे लागणार असल्याचे मुख्यमंत्री योगी यांनी सर्व विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक यांच्यासोबतच्या बैठकीत सांगितले आहे.
धार्मिक विचारसरणीनुसार सर्वांना स्वतःची प्रार्थनापद्धत मानण्याचे स्वातंत्र्य आहे. माइकचा वापर केला जाऊ शकतो, परंतु त्याचा आवाज धार्मिक स्थळाच्या बाहेर जाऊ नये. अन्य लोकांना यामुळे कुठलाच त्रास होऊ नये. धार्मिक कार्यांसाठी ध्वनिक्षेपकाचा वापर होऊ शकतो. नव्या स्थळांवर ध्वनिक्षेपक लावले जाऊ नयेत. धार्मिक मिरवणूक, शोभायात्रा अनुमतीशिवाय काढल्या जाऊ नयेत. सलोख्याला धक्का पोहोचणार नाही असे नमूद असलेले प्रतिज्ञापत्र संबंधित आयोजकांना द्यावे लागणार असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी
धार्मिक कार्यक्रम, पूजा इत्यादी गोष्टी निश्चित ठिकाणीच व्हाव्यात. वाहतुकीला अडथळा होईल अशाप्रकारचे कुठलेच आयोजन होऊ नये. स्थानिक गरजांचा विचार करत सर्व आवश्यक प्रयत्न केले जावेत. उपद्रव घडवू पाहणाऱया समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जावी. राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे. आम्हाला आमच्या या जबाबदारीबद्दल सदैव सतर्क आणि सावध रहावे लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांना संबोधित करताना म्हटले आहे.