‘हिंदू पब्लिशिंग ग्रुप’चे संचालक एन. राम यांच्याकडून व्यक्त मत, ज्ञानपीठविजेते साहित्यिक दामोदर मावजो यांचा सत्कार
प्रतिनिधी /फातोर्डा
पत्रकारितेत परखडपणे लिहिणाऱयांचा आज अंमलबजावणी विभाग, आयकर विभाग, सीबीआयसारख्या यंत्रणांचा गैरफायदा घेऊन छळ केला जातो. यातून काहीच निष्पन्न होणार नाही हे ठाऊक असूनही न्यायालयीन प्रक्रियेतून जावे लागून त्रास व्हावा हे यामागील उद्दिष्ट असते. त्यामुळे आज लोक स्पष्ट बोलायला कचरतात, असे मत दि हिंदू पब्लिशिंग ग्रुपचे संचालक एन. राम यांनी व्यक्त केले.
नवीन पिढी पत्रकारितेत यायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. भारतात धार्मिक तेढ वाढत चाललेली आहे. खोटय़ा बातम्यांचे प्रकारही वाढत आहेत. परखड आणि स्पष्ट भूमिका मांडणारे पत्रकार, लेखक, विचारवंत यांच्या दिवसाढवळय़ा हत्या होतात आणि आरोपी मात्र मोकाट फिरतात. अशा वेळी दामोदर मावजो यांच्यासारखे लेखक निर्भिडपणे आपली भूमिका मांडत राहतात हे अभिमानास्पद आहे, असे ते म्हणाले.
मडगाव येथील रवींद्र भवनच्या परिषगृहात प्रमुख पाहुणे या नात्याने एन. राम बोलत होते. साहित्यिक दामोदर मावजो यांना 2022 वर्षाचा प्रति÷sचा ज्ञानपीठ पुरस्कार घोषित झाल्यामुळे त्यांचा यावेळी नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक ऍड. उदय भेंब्रे, लेखक व अनुवादक जुझे लॉरेन्स, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर, निमंत्रक म्हणून कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्षा अन्वेषा सिंगबाळ, सत्कारमूर्ती मावजो व शैला मावजो या उपस्थित होत्या. सिंगबाळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी मावजो यांच्या जीवनकार्यावर बोलताना लॉरेन्स म्हणाले की, त्यांच्या साहित्याचे इंग्रजी, प्रेंच, पोर्तुगीज भाषांत अनुवाद झाले असून त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून कोकणी भाषेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविले आहे. त्यांच्या साहित्यकृतींतील विषय आणि पात्रांमुळे त्यांच्या साहित्याची लोकप्रियता वाढली. विविध देशी आणि विदेशी संमेलनांत सहभागी होऊन त्यांनी आपली ओळख घडवली आहे. जगातील इतर भागांतील लेखक गोव्यात यावेत म्हणून त्यांनी गोवा आर्ट अँड लिटरेचर फेस्टिव्हलची स्थापना केली, असे त्यांनी सांगितले.
यावेळी लोलयेकर यांनी सांगितले की, मावजो हे स्पष्टवक्ते व नम्रपणा जपणारे आहेत. त्यांनी कधी आडमार्गाने पुढे? जाण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे ते लोकप्रिय ठरले, असे ते म्हणाले. भेंब्रे म्हणाले की, कोकणी भाषेतील साहित्यरचना उशिरा सुरू झाली. नंतर पोर्तुगीज राजवटीत भाषेवर बंदी आल्याने साहित्यनिर्मितीत खंड पडला. पण नंतर मात्र कोकणी लेखकांनी अखंडपणे साहित्यनिर्मिती चालू ठेवली. त्यामुळे ज्ञानपीठपर्यंत कोकणी लेखक पोहोचू शकले, असे त्यांनी सांगितले. एन. राम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र व समई देऊन मावजो यांचा सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन समीक्षा पै धुंगट यांनी केले. मावजो यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अनंत अग्नी यांनी केले आणि त्यांनीच आभार मानले.