भारताने केली दहशतवादी हल्ल्याची निंदा
वृत्तसंस्था / पेशावर
पाकिस्तानच्या पेशावरमधील मशिदीत झालेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यात 90 हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर जखमींची संख्या 221 वर पोहोचली आहे. हा आत्मघाती स्फोट तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने घडवून आणला होता.
सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा आत्मघाती स्फोट घडवून आणला गेला होता, या हल्ल्यात नमाज पठण करण्यासाठी पोहोचलेले लोक बळी पडले आहेत. हल्ल्यानंतर पाकिस्तानात अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. तर पीडितांच्या कुटुंबीयांमध्ये दुःख आणि संतापाचे वातावरण आहे.
पाकिस्तानात झालेल्या हल्ल्याप्रकरणी भारत सरकारने दुःख व्यक्त केले आहे. भारतीय विदेश मंत्रालयाकडून हल्ल्याची निंदा करण्यात आली आहे. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केली आहे.
पाकिस्तानातील भारतीय दूतावासानेही पेशावरमधील हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पेशावरमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्याची भारत कठोर शब्दांत निंदा करत असल्याचे दूतावासाकडून म्हटले गेले आहे. भारतात अनेक ठिकाणी पेशावर हल्ल्यातील बळींकरता शोक व्यक्त करण्यात आला आहे. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोमवारी रुग्णालयात जात जखमींची भेट घेतली होती.
पेशावरच्या पोलीस लाइन्समधील मशिदीत सोमवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा वाढून 95 झाला आहे. ढिगाऱयाखालून लोकांना बाहेर काढण्यात येत असल्याने जखमींची संख्याही वाढली आहे. हल्ल्यात बळी गेलेले बहुतांश जण हे पोलीस कर्मचारी होते.