कनिष्ठ न्यायालयात जाण्याचा आदेश, न्यायालयाच्या अधिपत्यातील चौकशीलाही नकार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या दिल्ली पोलिसांकडून होत असलेल्या चौकशीवर लक्ष ठेवावे, ही कुस्तीपटूंची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच कुस्तीपटूंच्या याचिकांवरील सुनावणी आता बंद करण्यात आली असून त्यांना कनिष्ठ न्यायालयांमध्ये जाण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली. एक प्रकारे हा कुस्तीपटूंना झटका मानण्यात येत आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर कुस्तीपटू आणि पोलीस यांच्यात मारामारी झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी कुस्तीपटूंशी झटापट केली आणि त्यांना फरफटत नेले असा आरोप करण्यात आला आहे. तथापि, पोलिसांनी तो फेटाळला असून कुस्तीपटूंविरोधात बळाचा उपयोग करण्यात आलेला नाही, असे स्पष्ट केले आहे.
सुनावणी बंद
अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात कारवाई करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी याचिका काही महिला कुस्तीपटूंनी सादर केली होती. तथापि, आता दिल्ली पोलिसांनी सिंग यांच्या विरोधात एफआयआर नोंद करून चौकशीला प्रारंभ केला आहे. तसेच सर्व आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे आता या याचिकांमध्ये सुनावणी करण्यासारखे काही उरलेले नाही, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीला पूर्णविराम दिला आहे.
कनिष्ठ न्यायालयात जा
कुस्तीपटूंनी आता घटनेच्या 226 व्या अनुच्छेदानुसार त्यांच्या अडचणी दिल्लीतील न्याय दंडाधिकारी किंवा उच्च न्यायालय यांच्याकडे मांडाव्यात, असा आदेश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. पी. एस. नरसिंहा आणि न्या. जे. बी. परदीवाला यांच्या पीठाने कुस्तीपटूंना दिला. यावेळी त्यांचे वकील नरेंदर हुडा यांनी सर्वोच्च न्यायालयाने एका निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करावी, असा आग्रह धरला. याचिका बंद केल्यास दिल्ली पोलीस प्रकरण प्रलंबित ठेवतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र, न्यायालयाने चौकशीवर लक्ष ठेवण्यास नकार दिला.
दिल्ली पोलिसांकडून संरक्षण
कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी पुरेसे संरक्षण दिले आहे, असे दिल्ली पोलिसांचा पक्ष मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात स्पष्ट केले. त्यानंतर न्यायालयाने संरक्षण देण्याचा आदेश द्या, या मागणीवरही निरीक्षण नोंदविले. आता कुस्तीपटूंना संरक्षण दिले असल्याने तो मुद्दाही उरलेला नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी बंद केली.
मध्यरात्री काय घडले
मद्यधुंद अवस्थेत दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंशी मारामारी केली असा आरोप बजरंग पुनिया यांनी केला आहे. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांविरोधात मर्यादा सोडून वर्तन केल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. पोलिसांनी काही कुस्तीपटूंना रस्त्यावर ओढून फरफटत नेले. आंदोलन बंद पाडण्याचा प्रयत्न केला, असाही त्यांनी दावा केला. मात्र, दिल्ली पोलिसांनी तो फेटाळला आहे. एका राजकीय पक्षाकडून आंदोलनाच्या स्थानी दोन ट्रक भऊन फोल्डिंग कॉटस् नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मार्ग बंद करण्याचा त्यांचा कट होता. पोलिसांनी त्यांना अडविल्याने खटके उडाले, अशी माहिती तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली. पोलिसांनी कोणत्याही प्रकारे बळाचा उपयोग केलेला नाही. काही पोलिसांनाही जखमा झाल्या आहेत, असेही स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांकडून देण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत आंदोलन पुढे सुऊ ठेवण्याचा निर्धार कुस्तीपटूंनी केला आहे.
पदके परत करणार
पोलिसांनी मध्यरात्री बळाचा उपयोग केल्याने आमचा अपमान झाला आहे. त्यामुळे सर्व ज्येष्ठ कुस्तीपटू आतापर्यंत त्यांनी मिळविलेली पदके परत करणार आहेत, असे प्रतिपादन बजंरग पुनिया यांनी केले. आम्हाला काहीही नको आहे. केवळ न्याय हवा आहे. तो मिळविण्यासाठी आम्ही प्राणत्याग करण्यास सज्ज आहोत. आम्ही दबावाखाली येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.