संघाच्या कार्यालयावर फेकले बाँब, शेकडो वाहनांची जाळपोळ
येत्या 25 वर्षांमध्ये भारताचे इस्लामीकरण करण्याचे संघटनेचे ध्येय
थिरुवनंतपुरम / वृत्तसंस्था
राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकरणाने (एनआयए) केलेल्या देशव्यापी धडक कारवाईचा निषेध करण्यासाठी पीएफआय या इस्लामी संघटनेने केरळमध्ये पुकारलेल्या ‘बंद’ला हिंसक वळण लागले. केरळची राजधानी थिरुवनंतपुरम तसेच कोट्टायम येथे पीएफआयच्या हिंसक हस्तकांनी शेकडो वाहनांची तोडफोड केली. काही वाहनांना आगी लावण्यात आल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बाँब फेकण्यात आले असून राज्यामध्ये अनेक स्थानी हिंसाचार झाला आहे. गुरुवारच्या छापा-अटकसत्रानंतर झालेल्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. येत्या 25 वर्षांमध्ये भारताचे इस्लामीकरण करण्याचे या संघटनेचे ध्येय आहे, असे दर्शविणारी कागदपत्रे या संघटनेच्या कार्यालयांमध्ये सापडली असल्याचे एनआयएने स्पष्ट केले आहे. केरळमध्ये हिंसाचार भडकल्यानंतर आतापर्यंत 500 जणांना अटक करण्यात आली असून 400 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
गुरुवारी एनआयएने देशभरात 93 स्थानी पीएफआयच्या कार्यालयांवर धाडी घातल्या. या संघटनेच्या 106 हस्तकांना ताब्यात घेण्यात आले. ही धडक कारवाई 15 राज्यांमध्ये करण्यात आली. या संघटनेवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचे बोलले जाते. अन्वेषण प्राधिकरणाने केलेल्या कारवाईत अनेक महत्वाची कागदपत्रेही हस्तगत करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पोलिसांवरही हल्ले
कोल्लम येथे मोटारसायकलवरुन आलेल्या काही पीएफआय हस्तकांनी 2 पोलिसांवर हल्ले केल्याचे वृत्त आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी अभियान हाती घेतले आहे. थिरुवनंतपुरम येथे हिंसाचार करणाऱया 5 हस्तकांना पोलिसांनीं ताब्यात घेतले आहे. कोट्टायम येथे हिंसक जमावाने अनेक बसेसना आग लावली. आतापर्यंत या हिंसाचारात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेची मोठी हानी झाली आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
उच्च न्यायालयाची स्वतःहून दखल
केरळ उच्च न्यायालयाने या हिंसाचाराची गंभीर दखल घेतली आहे. पीएफआयने प्रशासनाची अनुमती न घेताच बंद पुकारल्याच्या घटनेची नोंद उच्च न्यायालयाने घेतली. एनआयएने घातलेल्या धाडींचे निमित्त करुन पुकारलेला हा बंद आणि त्यात केलेला हिंसाचार अयोग्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
अनेक शहरांमध्ये पडसाद
प्रथम थिरुवनंतपुरम आणि नंतर कोट्टायम येथे सुरु झालेल्या या हिंसाचाराचे लोण पाहता पाहता इतर शहरांमध्येही पसरल्याचे दिसत आहे. कोल्लम, कोझीकोड, वायनाड आणि अल्लप्पुझा येथेही निदर्शने करण्यात आली. या शहरांमध्येही काही प्रमाणात हिंसाचार झाला आहे.
सरकारी वाहनांची हानी
पीएफआय हस्तकांनी सरकारी बसेसवर मोठय़ा प्रमाणात दगडफेक केली. कोझीकोड आणि कन्नूर येथे झालेल्या दगडफेकीत एक 15 वर्षीय मुलगी आणि काही नागरिक जमखी झाले. त्यानंतर केरळच्या डाव्या शासनाने काही पावले उचलली. अनेक शहरांची नाकाबंदी करण्यात आली. केरळच्या गृहमंत्र्यांनी सव पोलीस स्थानकांना कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बिघडू न देण्याचा सल्ला दिला आहे. कायदा मोडणाऱयास कठोर शिक्षा केली जाईल, असा इशारा राज्याच्या पोलिसांनी दिला. सायंकाळनंतर परिस्थिती काहीशी नियंत्रणात आली होती.
पीएफआयचा दावा
आपला बंद हिंसा करण्यासाठी नसून एकतर्फी चालणारे शासन आणि फाशीवादी मनोवृत्ती यांच्याविरोधात आहे, अशी सारवासारवी करण्याचा प्रयत्न पीएफआयने केला आहे. आम्ही शोषित समाजाच्या हितासाठी आंदोलन करीत आहोत. हिंसाचार करण्यासाठी नाही, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
25 वर्षांमध्ये भारताचे इस्लामीकरण
येत्या 25 वर्षांमध्ये, म्हणजेच 2047 पर्यंत भारताचे इस्लामीकरण करण्याचे पीएफआयचे ध्येय आहे, असा आशय असलेली कागदपत्रे बिहारमध्ये पाटणानजीक असणाऱया फुलवारी शरीफ येथील पीएफआयच्या कार्यालयात सापडली आहेत. गुरुवारी घातलेल्या धाडीमध्ये ही कागदपत्रे एनआयएच्या हाती लागली असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. यासंबंधात चार हस्तकांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे.
भाजपचे राज्य सरकारवर शरसंधान
केरळचे पिनराई विजयन यांच्या नेतृत्वातील डाव्यांचे सरकार मतांसाठी पीएफआय विरोधात बोटचेपे धोरण अवलंबत असून या लांगूलचालनामुळेच राज्यातील परिस्थिती बिघडली आहे. विशिष्ट धर्माचा कट्टरतावाद वाढला आहे. पीएफआयने यापूर्वी पुकारलेल्या प्रत्येक बदच्या वेळी असा हिंसाचार झालेला आहे. मात्र, राज्य सरकारने या संघटनेला रोखण्यासाठी कोणतीही कृती केलेली नाही, असा आरोप राज्य भाजपचे प्रमुख के. सुरेंद्रन यांनी केला आहे.
दहशतवाद्यांना आर्थिक साहाय्य
कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा येथील दहशतवादी संघटनांना पीएफआयकडून मोठय़ा प्रमाणात धनसाहाय्य देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अनेक राज्यांमध्ये ही संघटना मोठय़ा प्रमाणात कार्यकर्त्यांसाठी शिबिरांचे आयोजन करीत आहे, याची माहिती एनआयएला मिळालेली आहे. या संघटनेच्या हस्तकांना दिल्या जाणाऱया प्रशिक्षणात शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षणही समाविष्ट आहे, अशी माहिती एनआयएला गुप्तचरांकडून मिळल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पीएफआयचे खतरनाक इरादे
ड भारताचे इस्लामीकरण करण्याचे पीएफआयचे कारस्थान झाले उघड
ड केरळमध्ये स्थिती तणावग्रस्त, उच्च न्यायालयाकडून स्वतःहून दखल
ड केरळ सरकार पीएफआयच्याच बाजूचे असल्याचा भाजपचा आरोप
ड गुरुवारी टाकलेल्या देशभरातील धाडींमध्ये प्रक्षोभक कागदपत्रे हस्तगत