आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख श्री श्री रविशंकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ दहिवडी
देवभक्ती, देशभक्ती या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रत्येकाच्यात देवभक्ती, राष्ट्रभक्ती असली पाहिजे. तुम्ही सर्व सेवेच्या कामात मग्नग्न व्हा मग तुमच्या जीवनात कशाचीच कमतरता राहणार नाही, असा कानमंत्र आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख श्री श्री रविशंकर यांनी आज दिला.
शिखरशिंगणापूर (ता. माण) येथे तीर्थक्षेत्र फाऊंडेशन, ग्रामस्थ व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्यावतीने आयोजित कोटी लिंगार्चन सोहळ्याच्या मंडप पूजन व धर्म ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार महादेव जानकर, आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, उद्योगपती रविंद्र भारती, आर्ट ऑफ लिव्हिंग विश्वस्त राजे शास्त्रsय, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या अध्यक्ष मोहन बडवे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. श्री. रविशंकर म्हणाले, आज देवांच्या ध्वाजाचं आरोहण झालं आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती समृध्दी येणार आहे. जीवनात देवतांचा प्रभाव असेल तर सुख शांती, समृध्दी असते. आणि जर राक्षसांचा प्रभाव असेल तर दुःख, भांडणं व्यसन यांचा अंमल असतो. तुमचं दुःख घेवून जाण्यासाठी आज मी येथे आलोय. सत्संग मधून जाताना कोणाच्याही मनात दुःख नाही पाहिजे. प्रसन्न होवून इथून जा. गुरूच्या जवळ का जातात? दुःखाचा नाश करण्यासाठी व सर्व समृध्दी मिळविण्यासाठी. गुरूच्याजवळ आल्यावर कोणत्याही कारणाशिवाय सुखाची अनुभूती होते. सर्व सुखी राहोत हीच संतांची भावना असते. प्रत्येकाच्या शरीरात संताचा अंश असतो. त्या संताला जागृत करा म्हणजे तुम्ही सुध्दा सर्वांच्या सुखाची इच्छा कराल. जिथे भक्ती, साधना आहे तिथे शारीरिक, मानसिक, आत्मिक शक्ती वाढीस लागते. आपल्या आद्य दैवताचे स्मरण, भजन आपल्यातील शक्ती जागृत करण्यासाठी करा, देवाला प्रसन्न करण्यासाठी नव्हे, देव प्रसन्न आहेतच. आपण आपल्या सन्मार्गावरून भटकला तर प्रकृती तुम्हाला धक्का देते, त्रास देते मग तुम्ही जागृत होता व पुन्हा योग्य मार्गावर येता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. श्री. रविशंकर यांच्या हस्ते शंभू महादेव व श्री विष्णूचा अभिषेक करण्यात आला. तर कार्यक्रम संपल्यानंतर गुप्तलिंग येथे वृक्षारोपण करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन मुख्य समन्व्यक अक्षयमहाराज भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी पार्किंग व बैठकीच्या व्यवस्थेची दक्षता घेतली होती. तर पोलिस प्रशासनाने तगडा पोलिस बंदोबस्त कार्यक्रमासाठी ठेवला होता.
श्री. श्री. रविशंकर म्हणाले, शिंगणापूर हे क्षेत्र खुपच अद्भुत आणि सुंदर आहे. भारतात कुठेही नाही असे एका ठिकाणी दोन लिंगे असणारे हे अतिशय विशेष स्थान आहे. या परिसरात असलेली झाडे तोडली गेली नाही पाहिजेत याकडे लक्ष द्या. खरंतर कोणतीच झाडं तोडली नाही पाहिजेत, वटवृक्ष तर नाहीतच. याठिकाणी एक लाख वृक्षारोपणाचा संकल्प घेण्यात आला आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. वृक्षारोपण व जलसंधारणाच्या कामात सर्वांनी सहभागी व्हा. येथे जलतारा कार्यक्रम आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे राबवूया. तुम्ही सर्वजण एकत्र येवून काम करा.
………