रंगपंचमी साजरी करून आंघोळीला गेला असता घडली दुर्घटना
वार्ताहर /किणये
रंगपंचमी साजरी करून आंघोळीला गेलेला पिरनवाडीचा तरुण खादरवाडी येथील धरणात बुडाला. अविनाश अरुण देवलेकर (वय 22) रा. सिद्धेश्वर गल्ली पिरनवाडी असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव असून सदर घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली. रंगपंचमीदिवशा पिरनवाडीच्या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अविनाशने मंगळवारी मित्रांसमवेत रंगोत्सवाचा आनंद लुटला. त्यानंतर खादरवाडी येथील धरणात आंघोळ करण्यासाठी तो गेला होता. धरणात पोहत असताना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे धरणात बुडून त्या मृत्यू झाला. अविनाश बुडाल्याचे काही जणांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी आरडाओरडा केला. काही स्थानिक तरुणांनी पाण्यात उडी घेऊन अविनाशला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही.
त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनीही धरणात दुपारपासून सायंकाळपर्यंत अविनाशला शोधण्याची मोहीम राबविली. सायंकाळी अविनाशचा मृतदेह सापडला. घटनास्थळी वडगाव ग्रामीणच्या पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. अविनाशने विज्ञान शाखेतून पदवी घेतली होती. तो गावातील एक प्रामाणिक असा तरुण होता. त्यामुळे सारेजण हळहळ करत होते. अविनाशच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे. आपला मुलगा धरणात बुडाल्याची दुर्घटना समजता त्याच्या आई व भावाने एकच आक्रोश केला होता.
सैन्य भरतीचे स्वप्न राहिले अधुरे..
अविनाशचे वडील अरुण देवलेकर हे निवृत्त सैनिक होते. त्यांचेही निधन झाले आहे. वडिलांप्रमाणे आपणही लष्करी सेवेत भरती होऊन देशाची सेवा बजावण्याचे स्वप्न अविनाशने ऊराशी बाळगले होते. सैन्यात भरती होण्यासाठी तो प्रयत्नही करीत होता. मात्र मंगळवारी धरणात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे त्याचे सैन्य भरतो स्वप्न अधुरे राहिल्याची माहिती त्याच्या मित्रांनी सांगितली.