राजद खासदाराने केली होती माफीची मागणी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी गुरुवारी बिहारसंबंधी केलेले स्वतःचे विधान मागे घेतले आहे. राज्य किंवा तेथील लोकांचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या वक्तव्यामुळे कुणालाही ठेस पेहोचली असल्यास स्वतःचे विधान मी त्वरित मागे घेतो असे वाणिज्य आणि उद्योगमंत्री तसेच सभागृहाचे नेते गोयल यांनी म्हटले आहे.
बिहार किंवा बिहारच्या लोकांचा अपमान करण्याचा माझा कुठलाच उद्देश नव्हता. कुठल्याही गैरभावनेने मी विधान केले नव्हते असे प्रारंभीच स्पष्ट करू इच्छितो असे गोयल यांनी नमूद केले आहे. राज्यसभेतील राजद खासदार मनोज झा यांनी सभापती जगदीप धनखड यांना पत्र लिहून भाजप नेत्याने माफी मागावी अशी मागणी केली होती. ‘त्यांना शक्य झाल्यास ते देशालाच बिहार करून सोडतील’ असे गोयल यांनी म्हटले होते.
गोयल यांच्या विधानामुळे बिहारच्या लोकांचा अपमान झाला आहे. वरिष्ठ सभागृहाच्या नेत्यासारखा व्यक्ती देशाच्या महान राज्यांपैकी एकाबद्दल अशाप्रकारचे मत बाळगतो यावर कुणाचाच विश्वास बसणार नसल्याचे मनोज झा यांनी म्हटले होते. पुरवणी मागण्यांवर सभागृहात चर्चा सुरु असताना गोयल यांनी ही वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यांच्या या टिप्पणीविरोधात राजद, संजद, काँग्रेस, झामुमोच्या खासदारांनी संसद भवन परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळय़ानजीक निदर्शने केली होती.