लाभार्थ्यांमध्ये खळबळ : अनारोग्याची भीती, आहार निरीक्षकांनी लक्ष देण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
अन्नभाग्य योजनेतून दारिद्र्या रेषेखालील जनतेला देण्यात येणाऱ्या रेशनच्या तांदळात प्लास्टिकसदृश तांदूळ सापडत असल्याने खळबळ माजली आहे. वारंवार असा तांदूळ लाभार्थ्यांच्या हाती लागत असल्याने या तांदळाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.
कोरोना संकटापासून गोरगरीब जनतेला प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्याचा पुरवठा केला जात आहे. केंद्र सरकारकडून 5 किलो आणि राज्य सरकारकडून 5 किलो असा एकूण 10 किलो तांदूळ माणशी वितरित केला जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे वितरित करण्यात येणाऱ्या तांदळामध्ये प्लास्टिकसदृश तांदूळ सापडत असल्याने रेशनचा तांदूळ खाण्याबाबत आता शंका निर्माण होऊ लागली आहे. शिवाय या तांदळामुळे शरीराला धोका निर्माण होण्याची चिंताही लाभार्थ्यांतून व्यक्त केली जात आहे. काही लाभार्थ्यांनी रेशनचा तांदूळ शिजत घातल्यानंतर तो पाण्यावरतीच तरंगत असल्याने प्लास्टिकचा असल्याचे निष्पन्न होत आहे. दरम्यान, लाभार्थी हा प्लास्टिकचा तांदूळ असून शरीराला धोका असल्याचे सांगत आहेत.
अंत्योदय आणि बीपीएल कार्डधारकांना रेशनचा पुरवठा केला जातो. दरम्यान, काही लाभार्थ्यांना प्लास्टिकचा तांदूळ मिळत आहे. घरी नेऊन शिजविल्यावर प्लास्टिकसदृश असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणारा तांदूळ खाण्याविना टाकून द्यावा लागत आहे. शिवाय इतर लाभार्थ्यांमध्येदेखील भीती निर्माण झाली आहे. वारंवार प्लास्टिकचा तांदूळ मिळत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे लाभार्थी चांगलेच धास्तावले आहेत. दिसायला वरून पांढरा शुभ्र तांदूळ असला तरी शिजविल्यावर पाण्यात तरंगणे आणि जाळल्यावर प्लास्टिकचा वास येत आहे. त्यामुळे गृहिणीदेखील अन्नभाग्यच्या रेशनाबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत. अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या आहार निरीक्षकांनी याकडे जातीने लक्ष घालून दर्जेदार तांदूळ द्यावा, अशी मागणी होत आहे.
विशेषत: तालुक्यातील जाफरवाडी, अलतगा, आंबेवाडी, अतिवाड, कल्लेहोळ आदी ठिकाणी असा प्लास्टिकसदृश तांदूळ मिळाला आहे. त्यामुळे असा तांदूळ घेऊन काय करावा? अशा संतप्त प्रतिक्रियाही लाभार्थ्यांतून व्यक्त होत आहेत. शिवाय या तांदळाने आरोग्याला धोका होईल, या भीतीने तांदूळ टाकून द्यावा लागत आहे.