रस्त्यांवर खड्डेच खड्डे : दुरुस्तीकडे संबंधित लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : वाहनधारकांसह ग्रामस्थांमधून तीव्र संताप
वार्ताहर /हिंडलगा
गेल्या अनेक वर्षांपासून आंबेवाडी ते मण्णूर गावाला जोडणाऱया संपर्क रस्त्याच्या डांबरीकरणाकडे लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सर्वत्र खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झाली असून वाहनधारक व ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सुमारे दीड ते दोन किलोमीटरचा मण्णूर व आंबेवाडी गावाला जाण्यासाठी अत्यंत जवळचा रस्ता आहे. त्यामुळे मण्णूर, आंबेवाडीसह गोजगा, उचगाव, बसुर्ते, कोणेवाडी, हिंडलगा, सुळगा आदी भागातील लोक कडोली किंवा अलतगे गावाला जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. तर सरकारी परिवहन मंडळाची बस देखील याच मार्गावरून प्रवास करीत असते. असा हा अत्यंत वर्दळीचा रस्ता, मात्र लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आशीर्वादामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेत सापडला आहे. रस्त्यावरील अवजड वाहनांची सततची वर्दळ आणि ठराविक वेळी रस्त्याचे डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडून दुर्दशा झाली आहे. तसेच पावसामुळे रस्त्यावर चिखल होऊन दलदल निर्माण झाली आहे.
सदर खड्डय़ांमध्ये पाणी साचल्याने रस्त्याला आता तलावाचे स्वरुप प्राप्त झाले असून, वाहनधारकांना येथून प्रवास करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. शिवाय खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकदा लहान-मोठे अपघात होत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनी याची दखल घेऊन त्वरित रस्त्याचे डांबरीकरण करून वाहनधारकांचे होणारे हाल थांबविण्याची मागणी होत आहे.