सांबरा/ वार्ताहर
अवघ्या सहा महिन्यापूर्वी केलेल्या शिंदोळी क्रॉस ते बसरीकट्टी रस्त्याची दुर्दशा झाली असून, वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
फेब्रुवारी महिन्यामध्ये बसरीकट्टी गावची श्री महालक्ष्मी यात्रा झाली होती. या यात्रेच्या पूर्वी सदर रस्ता बनविण्यात आला होता. त्यावेळी घिसाडघाईने रस्ता बनविण्यात आला होता. मात्र अवघ्या सहा महिन्यात रस्त्याची वाट लागली असल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. रस्त्यावरील खडी उखरून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. अवघ्या सहा महिन्यात रस्त्याची दुर्दशा झाल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तरी संपूर्ण रस्ता खराब होण्यापूर्वी तातडीने रस्त्याची दुऊस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.