वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामध्ये होणाऱया 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या मशाल रिलेचा शुभारंभ रविवारी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्याहस्ते करण्यात आला. बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी प्रथमच टॉर्च रिलेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा महाबलिपूरम येथे 28 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना फिडेने प्रथमच या स्पर्धेसाठी टॉर्च रिलेची परंपरा सुरू केली आहे. ही प्रथा ऑलिम्पिकसाठी नेहमी वापरली जाते. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये यापूर्वी ही पद्धत कधीच वापरण्यात आली नव्हती. फिडेचे अध्यक्ष अर्कादी द्वोरकेविच यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे सर्वप्रथम मशाल सुपूर्द केल्यानंतर त्यांनी ती महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदकडे सोपवली. 40 दिवसांच्या कालावधीत सदर मशाल 75 शहरांत फिरवली जाणार असून चेन्नईजवळील महाबलिपूरम येथे स्पर्धास्थळी शेवटी त्याचे आगमन होणार आहे. मशाल पोहोचलेल्या प्रत्येक शहरात तेथील ग्रँडमास्टर्स त्याचे स्वागत करतील.ग्न रिले होणाऱया 75 शहरांत लेह, श्रीनगर, जयपूर, सुरत, मुंबई, भोपाळ, पाटणा, कोलकाता, गंगटोक, हैदराबाद, बेंगळूर, थ्रिशुर, पोर्ट ब्लेअर, कन्याकुमारी यांचाही समावेश आहे.
बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या सुमारे शंभर वर्षांच्या इतिहासात ही अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा भारतात प्रथमच आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी 188 देशांनी आपला सहभाग निश्चित केला असून या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक देश भारतीय भूमीवर प्रथमच एकत्र आलेले दिसणार आहेत.
बुद्धिबळ पटावर भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हंपीविरुद्ध पंतप्रधान मोदी यांनी चाल खेळून रिलेचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, ‘बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या पहिल्या टॉर्च रिलेची सुरुवात भारतातून होत असून भारतात ही स्पर्धा भरविण्याची देखील ही पहिलीच वेळ आहे. या खेळाचा उगम भारतातच झाला असून आता जगभरात त्याची प्रकर्षाने दखल घेतली जात आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. बुद्धिबळाचे त्याच्या जन्मस्थानी आगमन झाल्याचा आम्हाला खूप आनंद होत असून त्याचे यश बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या आयोजनाने आम्ही साजरे करीत आहोत. टॉर्च रिले प्रथेची सुरुवात भारतातून व्हावी, असा निर्णय फिडेनेच घेतला आहे. हा फक्त भारताचाच नव्हे तर बुद्धिबळाचाच सन्मान आहे,’ अशा भावना मोदीजींनी व्यक्त केल्या. बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून ते शिक्षणाचे एक साधन बनले असल्याचेही ते म्हणाले.
‘भारतामध्ये कुस्ती, कबड्डी, मलखांब यासारखे क्रीडाप्रकार फिटनेस राखण्यासाठी खेळले जात असत आणि विश्लेषणात्मक कौशल्य वाढविण्यासाठी आपल्या पूर्वजांनी बुद्धिबळ खेळाचा शोध लावला. हा खेळ नंतर जगभर पसरत गेला आणि त्याने खूप लोकप्रियताही मिळविली. आजच्या घडीला या खेळाकडे शैक्षणिक साधन म्हणून पाहिले जात असून बुद्धिबळपटू हे समस्या सोडविणारे बनले आहेत. योग व ध्यान बुद्धिबळात यशस्वी ठरण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास उपस्थित असलेले केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी क्रीडा क्षेत्राला पाठबळ व प्रोत्साहन दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. ‘बुद्धिबळाचे उगमस्थान असलेल्या भारताला या स्पर्धेच्या आयोजनाची प्रथमच मोठी संधी लाभली आहे. पंतप्रधानांनी त्याला पाठबळ दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. यापुढे टॉर्च रिलेची सुरुवात भारतातूनच केली जाईल. 1956 मध्ये भारताने सर्वप्रथम बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भाग घेतला होता आणि पदक मिळविण्यासाठी अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागली. पण त्यानंतर भारताने मागे वळून पाहिलेले नाही. सध्या देशांत खेळबद्दल खूप जागरूकता निर्माण झाली असून यासाठी पंतप्रधान मोदीजींचे आभार मानायला हवेत. ते फक्त उत्साही, क्रीडाप्रेमीच आहेत, असे नव्हे तर खेळांचे ते चाहतेही असून क्रीडापटूंची खूप काळजीही घेतात,’ असे ठाकुर म्हणाले.
फिडेचे अध्यक्ष द्वोरकोविच यांनी ही प्रतिष्ठेची स्पर्धा आयोजल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानले. ‘टॉर्च रिलेची नवी परंपरा भारतातून सुरू होत आहे, याने मी खूप आनंदित झालोय. ऑलिम्पिक क्रीडाज्योत हे ऑलिम्पिक चळवळ व मैत्रीचे प्रतीक आहे, तसेच या टॉर्च रिलेबद्दल म्हणता येईल. भविष्यातदेखील ही प्रथा चालू ठेवली जाईल आणि त्याची सुरुवात भारतातूनच केली जाईल,’ असे म्हणत त्यांनी भारत सरकारच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय पारंपरिक नृत्याने करण्यात आली. तसेच या खेळाचा पूर्वेतिहास, उगम, विकास, विस्तार यांचेही दर्शन यावेळी घडविण्यात आले.