शांततेसाठीच्या योगदानाकरता भारत तत्पर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी झेलेंस्की यांना लवकरात लवकर हे युद्ध संपविण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर चर्चा केली आहे.
कुठल्याही संघर्षावर सैन्यकारवाईने तोडगा निघू शकत नाही. शत्रुत्व समाप्त करून चर्चेच्या आधारावर कूटनीतिचा मार्ग अनुसरण्याची गरज असल्याचे मोदींनी झेलेंस्की यांना उद्देशून म्हटले आहे. भारत युक्रेनसह अन्य सर्व देशांमधील आण्विक प्रकल्पांच्या सुरक्षेला महत्त्व देतो. आण्विक दुर्घटनेमुळे सार्वजनिक आरोग्य किंवा पर्यावरणासाठी दूरगामी तसेच विध्वंसक परिणाम होऊ शकतात असे मोदींनी नमूद केले आहे.
शांततेसाठीच्या सर्व प्रयत्नांमध्ये योगदान करण्यासाठी भारत पूर्णपणे तत्पर आहे. संयुक्त राष्ट्रसंघ चार्टर, आंतरराष्टीय कायदे आणि सर्व देशांच्या सार्वभौमत्त्वाचा आदर करणे महत्त्वाचे असल्याचे मोदींनी चर्चेवेळी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी एससीओ परिषदेदरम्यान रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्याशी युक्रेन युद्धावरून चर्चा केली होती. ही वेळ युद्धाची नसल्याचे मोदींनी पुतीन यांना सांगितले होते.
युक्रेन आणि रशिया यांच्यात मागील 7 महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. अलिकडेच युक्रेनच्या आण्विक प्रकल्पाच्या प्रमुखांचे रशियाच्या सैनिकांनी अपहरण केले होते. जपोरिजिया अणुऊर्जा प्रकल्पाचे महासंचालक इहोर मुराशोव्ह यांची कार रोखत रशियाच्या सैनिकांनी त्यांचे अपहरण करत अज्ञातस्थळी नेले होते. जपोरिजिला अणुऊर्जा प्रकल्पात यापूर्वी एकदा आग लागली होती. या प्रकल्पावर रशियाच्या सैनिकांनी कब्जा केला होता. तरीही युक्रेनच्या कर्मचाऱयांनी प्रकल्पाचे संचालन सुरू ठेवले होते. युद्धामुळे प्रकल्पातील अखेरचा रिऍक्टर सप्टेंबरमध्ये बंद करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा संस्थेचे अनेक कर्मचारी या प्रकल्पात काम करतात.