बेळगाव
‘फुलांवर प्रेम इथे, सारे जण करतात,
जिची काट्यांवर माया, तिला आई म्हणतात,
चिंध्या रंगीत जोडून, जरी झाकलेले अंग,
म्हणे माझ्या संसाराला इंद्रधनुष्याचे रंग,
कवी अनिल दीक्षित यांनी ‘आई’ कविता सादर करताना कुटुंबात अठराविश्वे दारिद्र्या असले तरी त्याचे चटके आई आपल्या मुलांना सोसू देत नाही, हे दाखवून दिले. आई ही अशी व्यक्ती असते जिच्यामुळे घराला घरपण येते. ती जेव्हा निघून जाते तेव्हा घराचे घरपणही निघून जाते. आपला मुलगा अथवा मुलगी कशीही असली तरी त्या आईला आपले मूल सर्वात प्रिय असते. त्यामुळे प्रत्येकानेच देवाप्रमाणे आईचा सन्मान करावा, असे त्यांनी कवितेतून सांगितले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कवी संमेलनात विविध विषयांवरील कवितांचे सादरीकरण झाले. सांगली येथील कवी रमजान मुल्ला व रविंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. यामध्ये बेळगावमधील नवोदित कवींनीही सहभाग घेतला. आयुष्य, बेळगावची संस्कृती, आई मला तुझ्यावर खूप खूप प्रेम करायचे आहे, अशा विविध कविता संमेलनात सादर करण्यात आल्या. कवि अनिल दीक्षित व रमजान मुल्ला यांनी एकाहून एक सरस कविता सादर करून उपस्थित बेळगावकर रसिकांची वाहवा मिळविली. दोन शब्दांची कविताही अंतर्मुख करण्यास लावते हे या कवींनी दाखवून दिले.
कथाकथनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर येथील ज्येष्ठ कथाकार आप्पासाहेब खोत यांनी गॅदरिंगचा पाहुणा ही कथा सादर केली. आप्पासाहेब खोत यांना एका गॅदरिंगला प्रमुख पाहुणा म्हणून बोलाविले जाते. परंतु कोण आप्पासाहेब खोत हेच माहिती नसल्याने निमंत्रित करणाऱ्यांचा झालेला गोंधळ, त्यातून झालेले विनोद हे सर्व त्यांनी कथेतून मांडले. कथा विनोदी असली तरी माणसातील माणूस कसा शोधला जातो, हे त्यांनी सांगितले.